केंद्रीय मंत्री व भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल, असा दावा केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून महाविकास आघाडीचं सरकार देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार असल्याचं म्हटलं आहे. तसंच हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, “हे सरकार चार वर्ष पूर्ण करेल. एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि चार वर्ष पूर्ण करेल. निराश झाल्यानेच तसंच सर्व प्रयत्न फसल्याने विरोधी पक्षातील नेते असं वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्रातील जनता या सरकारसोबत आहे. संपूर्ण देशातील मजबूत सरकार महाराष्ट्रात आहे”. तीन दिवसांचं सरकार जे केलं होतं त्याची आज पुण्यतिथी आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

आणखी वाचा- लक्षात ठेवा, पुढच्या दोन-तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल; रावसाहेब दानवेंचा दावा

“तीन दिवसाच्या सरकारचा एक प्रयोग झाला होता त्याची आज पुण्यतिथी आहे. आता हे तीन महिन्यात करणार असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “उद्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य काम करत आहे. तीन पक्षांचं सरकार असूनही भक्कम आहे. देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार महाविकास आघाडीचं आहे,” असं ते म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी यावेळी चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांसंबंधी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, “चंद्रकांत पाटलांनी वेगळी गुप्तचर यंत्रणा सुरु केली असेल तर केंद्र सरकारने फायदा करुन घ्यावा. राजकारणात एवढी मजबूत गुप्तचर यंत्रणा मी पाहिली नव्हती,” असा टोला लगावला आहे. “शरद पवारांना काय करायचं ते करतील. ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत,” असंही ते म्हणाले.