मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं काय झालं असं विचारावं लागेल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “सीबीआय कुठेच दिसत नाही त्यामुळे तपास पुढे जाईल असं वाटत नाही. मारुती कांबळेचं काय झालं ? तसं आता मुंबई, महाराष्ट्राच्या लोकांना बिहारच्या पोलिसांना, तेथील राज्यकर्त्यांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं? असं विचारावं लागणार आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“बिहार निवडणुकीत सुशांत सिंह प्रचाराचा मुद्दा असावा म्हणूनच तर केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून राजकारण केलं. जेडीयूने आतापासूनच सुशांतच्या नावे पोस्टर छापून प्रचारात आणले आहेत. विकासाचा कोणताही मुद्दा नाही, कामासंदर्भातील मुद्दे नाहीत, सुशासन नाही म्हणून मुंबईतील मुद्दे प्रचारात आणले आहेत. तेथील राज्याच्या पोलीस प्रमुखांनी या नाट्यात पडदे ओढण्याचं काम केलं. राजीनामा दिला असून बक्सरमधून ते निवडणूक लढत आहेत. सुशांत सिंह प्रकऱणात हे सर्व आधीच ठरलं होतं, त्याप्रमाणे नाट्य पुढे चाललं आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“बिहारमध्ये करोना संपलाय का?,” निवडणूक जाहीर झाल्याने संजय राऊत यांचा संतप्त सवाल

ड्रग्ज प्रकऱणी सुरु असलेल्या तपासावर बोलताना ते म्हणाले की, ‘एनसीबीचं काम देशातील रॅकेट उद्धवस्त करणं आहे. देशाच्या सीमांवर जे हजारो कोटींचे अंमली पदार्थ येत आहेत हे सगळं संपवणं आहे. पण आज एका एका व्यक्तीचा तपास करत आहेत. यासाठी प्रत्येक शहरात एक वेगळा विभाग असतो. सुशांत प्रकरणात सीबीआयच्या हाती काही लागत नाही हे झाल्यावर एनसीबीचा तपास सुरु असेल. तपास होणं गरजेचं आहे. म्हणजे एकदाच काय ते संपवून टाकू”.

महापालिका कारवाई प्रकरणी प्रतिवादी करण्यात आल्यासंबंधी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “माझी काही बाजूच नाही तरीपण मांडेन. जी कारवाई झाली ती बेकायदा बांधकामावर आहे. त्याच्याशी माझा संबंध नाही. आम्ही फक्त वक्तव्य करुन लोकांना जागरुक केलं. कोणीतरी मुंबईत राहून पाकिस्तान म्हणतंय; शिवेसना, पालिकेला बाबर सेना म्हणणं महाराष्ट्राच्या अस्मितेला धोकादायक होतं”.