शेतजमिनीचे वाद हे किती टोकाचे असतात याचे एक ताजे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. तुळजापूर तालुक्यात शेतीच्या जुन्या वादातून चुलत्याने आपल्या दोन पुतण्यांची खोऱ्याने ठेचून क्रूरपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

आरळी बु. येथील सुरेश यादव (वय ५५) याने त्याचे पुतणे रमेश विठोबा यादव (वय ४७) आणि गणेश गोविंद यादव (वय २९) यांच्या डोक्यात शेतीच्या कामात वापरण्यात येणाऱ्या खोऱ्याचा वापर करीत पाठीमागून डोक्यात वार करून क्रूरपणे गंभीर जखमी केले. घटनेनंतर आरोपी सुरेश यादव आणि त्याचा मुलगा संभाजी सुरेश यादव (वय २१) हे दोघेही फरार झाले आहेत. शेतीच्या वादातून हे हत्याकांड घडले आहे. सततच्या शेतीवादाचा परिणाम हा दोन व्यक्तीच्या हत्या करण्यापर्यंत झाला.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक राऊत, ईटकळ दूरक्षेत्राचे सातपुते यांच्यासह गावचे पोलीस पाटील युवराज पाटील, उपसरपंच व्यंकट पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष किरण व्हरकट, सुनील पारवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या हत्याकांडामुळे आरळी व परिसर हादरून गेला आहे.