दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवलेल्या एका १६ वर्षीय गुणवंत विद्यार्थीनीवर गावातील दोन नराधम तरुणांनी बलात्कार केला, यामुळे व्यथित झालेल्या या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कसर्ला गावात ही घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने सुसाईड नोट लिहून ठेवल्याने त्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आत्महत्या केलेली तरुणी नुकतीच दहावीची परीक्षा ६१ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली होती. शुक्रवार ७ ऑगस्टला ती पालकांच्या सांगण्यावरून आपल्या शेतात कामानिमित्त गेली होती. तर तिची आई रोवणीचं काम सुरु असल्याने मजुरीला गेली होती. दरम्यान, ही तरुणी शेतावर जात असताना आरोपींनी पाठलाग करून तिला अडवले आणि तिच्यावर अत्याचार केला.

या अत्याचारामुळे व्यथित झाल्याने या तरुणीने सायंकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्त्या केली. तत्पूर्वी तिने घरी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत तिने गावातीलच दोन तरुणांनी बलात्कार केल्याने आत्महत्त्या करीत असल्याचे लिहिले आहे. दरम्यान, मृत मुलीच्या आईने नागभीड पोलीस स्टेशनला तक्रारही नोंदवली. या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

या घटनेचा तपास नागभीड पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिपक गोतमारे यांच्या मार्गदर्शनात एपीआय पूनम पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.