प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी ओझर येथील किर्तनामध्ये केलं होतं. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप नोंदवल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं होतं. त्यासंदर्भात इंदुरीकर यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी यासंदर्भात आपली पहिली प्रितिक्रिया दिली आहे.

सिंधुताईंनी मंगळवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी इंदुरीकर माहराजांबद्दल बोलताना त्यांनी, “इंदुरीकर हे चांगले व्यक्ती आहेत,” असं मत व्यक्त केलं. “काही पौराणिक दाखले देत असताना कीर्तनकार इंदोरीकर महाराज नकळत बोलून गेले असतील. त्याचं इतकं का भांडवल करताय?,” असा सवालही सिंधुताईंनी उपस्थित केला.

इंदुरीकर महाराजांना सल्ला

यावेळेस बोलताना सिंधुताईंनी इंदुरीकर महाराजांना एक सल्लाही दिला. आपण किर्तन सोडून शेती करु अशी प्रतिक्रिया देणाऱ्या इंदुरीकरांना सिंधुताईंनी सल्ला देताना, असं न करण्याचा सल्ला सिंधुताईंनी दिला आहे. “इंदुरीकरांचं समाजासाठी योगदान फार मोठं आहे. त्यांनी आपल्या किर्तनांमधून समाज प्रबोधन केलं. या माध्यमातून त्यांनी तरुणांना वाईट मार्गातून बाजूला तर केलच शिवाय त्या तरुणांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्रही दिला. त्यामुळे इंदुरीकरांनी आपण चुकलो असं म्हणत आपलं कार्य सुरु ठेवावं,” असा सल्ला सिंधुताईंनी इंदुरीकरांना दिला आहे.

टीकाकारांना म्हणाल्या…

इंदुरीकरांना सल्ला देतानाच सिंधुताईंनी टिका करणाऱ्यांनाही एक सल्ला दिला आहे. “टीकाकारांनीही महाराजांच्या शब्दाला धरुन न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन वाद मिटवता घ्यावा,” असं मत सिंधुताईंनी व्यक्त केलं.