संचारबंदी दोन तासांसाठी शिथिल
शहरातील दंगलग्रस्त मच्छीबाजार परिसरात तिसऱ्या दिवसानंतर बुधवारी प्रथमच सकाळी दोन तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. दरम्यान गोळीबारात जखमी झालेल्या आणखी एकाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने दंगलीतील मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. दंगलप्रकरणी आतापर्यंत फक्त एकाच संशयिताला अटक करण्यात आली आहे. चौकशी अधिकारी कायदा-सुव्यवस्था आस्थापना शाखेचे पोलीस महासंचालक जावेद अहमद धुळ्यात तळ ठोकून आहेत.
रविवारी दुपारी तीननंतर मच्छीबाजार भागात उसळलेली दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. मुंबई येथे उपचार घेत असलेल्या युसूफ अब्बास शहा (२१) या जखमीचा बुधवारी मृत्यू झाल्याने गोळीबारात ठार झालेल्यांची संख्या सहावर गेली आहे. पोलिसांनी तब्बल आठ हजारांच्या जनसमुदायावर दंगलीचा गुन्हा नोंदविला असला तरी वादग्रस्त हॉटेलचा मालक किशोर वाघ या एकाच संशयिताला अटक झाली आहे. त्याला न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, सकाळी नऊ ते ११ या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आल्यावर नागरिकांची जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी एकच धावपळ उडाली.