|| मोहन अटाळकर अमरावती : गावागावांतील परंपरेचे आणि धार्मिक-सामाजिक चालीरीतींचे दर्शन या जत्रांमधून घडते. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमारेषेवर बहरणारी बहिरमची यात्रा अंतिम टप्प्यात आहे. या यात्रेचे स्वरूप पार बदलले, लोकरंजन ते जनप्रबोधनाच्या प्रवासातही बहिरमच्या यात्रेने आपले आगळेपण जपले आहे. सातपुडय़ाच्या पायथ्याशी भरणारी बहिरम यात्रा ही ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेत शेतकरी मोठय़ा संख्येने हजेरी लावतात. यात्रेत नवनवीन शेती साहित्य, अवजारे विक्रीसाठी येतात. तसेच शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बहिरम यात्रेच्या माध्यमातून प्रसिद्धी केली जात होती. पण, अलीकडच्या काळात या कामांना शिथीलता आली आहे. पुर्वी घुंगरूच्या आावाजासाठी प्रसिद्ध असणारी ही यात्रा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने काही वर्षांपुर्वी तमाशामुक्त झाली. त्याजागी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी यात्रेत शासकीय सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला. बालमेळावा, शंकरपट, तिरंगा माझा, कव्वाली, कुस्ती, लावणी, आखाडा स्पर्धा, महिला मेळावा, कृषी व पशु प्रदर्शन आरोग्य शिबीर प्रबोधनात्मक कीर्तन प्रवचन व यात्रेत यात्रा शासकीय यात्रा यासारखे अभिनव कार्यक्रम राबविण्यात येतात. सव्वा महिना चालणारी ही एकमेव यात्रा आहे. उंच टेकडीवर हे भैरवनाथाचे मंदीर आहे. येथे भैरवाची भव्य मूर्ती आहे. पूर्वी या मंदीरात जाण्यासाठी जवळपास १३०० दगडी पायऱ्यांवरुन पायी चालत जावे लागत असे. यात्रेची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. सातपुडय़ाच्या कुशीत वसलेले ‘बहिरम बुवा’ हे लोकदैवत आहे. हे ठिकाण ‘भैरवाचे ठिकाण’ म्हणून ओळखले जाऊ लागले. भैरवाचा अपभ्रंश होऊन कालांतराने हे ‘बहिरम’ नाव प्रचलीत झाले. पूर्वी येथील यात्रा नागदिवाळीपासून सुरू होत असे. कालांतराने त्यात बदल होत गेला. आता सरकारी आदेशानुसार २० डिसेंबर ते ३१ जानेवारी या काळात ही यात्रा भरते. या यात्रेच्या स्वरूपात काळानुरूप बदल झाला आहे. पूर्वी सरदार मंडळी आपापल्या शक्तीचे प्रदर्शन करीत होते. घोडे-सैनिकांसह राहुटय़ा टाकलेल्या असत. त्यानंतरच्या काळात गावोगावचे श्रीमंत, प्रतिष्ठित नागरिक राहुटय़ा, तंबू, डेरे टाकून येथे मुक्काम करीत असत. मोठय़ा जेवणावळी उठत. यात्रेचा हंगाम म्हणजे, शेतीच्या उत्पन्नाचे पैसे मिळणे सुरू होण्याचा काळ. त्यामुळे या यात्रेत आर्थिक उलाढालही मोठय़ा प्रमाणात होते. पूर्वी बैलगाडी, दमणी, छकडे, रेंगी, शेतीची विविध औजारे, बैलबाजार, दोर अशा शेतीशी संबंधित वस्तूंची मोठी विक्री होत असे. ठिकठिकाणच्या प्रसिद्ध तयार वस्तू विक्रीसाठी येत असत. मातीची भांडी, लाकूड, बांबूच्या वस्तूंची विक्री होई. करमणुकीसाठी दंढार भरत असे. त्यानंतर तमाशांची फड रंगू लागले. लोकांदोलनानंतर तमाशे बंद झाले. आता लोककला, बाळमेळावा, शेतकरी जागृती, कृषिविषयक कार्यक्रमांचे आयोजन असते. लोककला महोत्सवाची रंगत याच यात्रेत यावर्षी २६ ते २८ जानेवारी असे सतत तीन दिवस आंतरराज्यीय लोककला महोत्सवाचे आयोजन केले गेले होते. यात महाराष्ट्र , मध्य प्रदेश व कर्नाटक राज्यातून आलेल्या १५०पेक्षा अधिक कलावंतानी आपापल्या राज्यातील प्राचीन लोककला सादर करून रसिकांना आपल्या प्राचीन लोककलेचे मनोज्ञ दर्शन घडविले. लोककला महोत्सवात अनिता खरात यांनी गायीलेला महाराष्ट्रीय पोवाडा, मध्यप्रदेशातील लोककलावंतांनी सादर केलेले गुदूम बाजा नृत्य तर कर्नाटक राज्यांतील कलावंतांनी आपल्या कर्नाटकीय शैलीत सादर केलेल्या ढोलुकुनिथा या नृत्याच्या सादरीकरणाला उपस्थित शेकडो रसिकांनी आपला उत्फुर्त दाद दिली. लोककला सादरीकरणामध्ये तिनही राज्यातून आलेल्या लोककलावंतांनी मेळघाटातील सुप्रसिद्ध कारकूनृत्य , घारीया नृत्य ,थाटय़ा नृत्य व महाराष्ट्राच्या लोककलेचा मुकूटमणी असलेला पोवाडा सादर करून आपल्या प्राचीन लोककलेचा परिचय उपस्थित रसिकांना करुन दिला.