केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांच्याशी जवळपास एक तास चर्चा केली. शैक्षणिक क्षेत्रातील नियुक्तयांच्या संदर्भात या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, इराणी यांच्या दौऱ्याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती व स्थानिक भाजप नेत्यांना त्यांच्या दौऱ्याची माहिती नव्हती.
केंद्रात महत्त्वाची खाती सांभाळणारे मंत्री सरसंघचालकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा क्रम गत काही महिन्यांपासून सुरू आहे. स्मृती इराणी यांची नागपूर भेट याचाच एक भाग असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशियाचा दौरा आटोपून स्मृती इराणी मंगळवारी दिल्लीत परतल्या आणि आज तडकाफडकी नागपुरात दाखल झाल्या.
इराणी सकाळी ९.३० वाजता विमानतळावरून थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात आल्या. तेथे त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. दुपारी १२.४० ला त्या दिल्लीला रवानाही झाल्या. केंद्राच्या नवीन शिक्षण प्रणालीसह केंद्रीय शिक्षण संस्थांच्या महत्त्वाच्या नियुक्तीच्या विषयावर यावेळी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चर्चेचा अधिकृत तपशील मात्र समजू शकला नाही.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून स्मृती इराणी कार्यक्रम आणि बैठकीच्या निमित्ताने यापूर्वी दोनवेळा नागपुरात आल्या असताना त्या संघ कार्यालयात फिरकल्याही नव्हत्या; मात्र त्यांच्या या तडकाफडकी ठरलेल्या नागपूर दौऱ्याबाबात कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याने त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
भाजपच्या अनेक नेत्यांना स्मृती इराणी यांच्या दौऱ्याची माहिती नव्हती. त्यामुळे इराणी या नागपुरात नेमक्या कशासाठी आल्या आणि केव्हा परत गेल्या याची माहिती ते देऊ शकले नाही.

पदवीवरूनही चर्चा
स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पदवीवरून मधल्या काळात मोठे वादंग उठले होते. लोकसभेतही या विषयावर चर्चा झाल्यानंतर त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र, भाजपचे नेते आणि संघ परिवार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा होता. या विषयावर त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.