दीड महिन्यात झाडांच्या कत्तलीची दुसरी घटना; वन विभागाचे दुर्लक्ष पालघर : मनोर-वाडा रस्त्यालगत असलेल्या अंभईच्या जंगलातील खैर झाडांची कत्तल सुरूच असून या झाडाची चोरटय़ा मार्गाने तस्करी होत आहे. दीड महिन्यात झाडे कापून नेल्याची ही दुसरी घटना आहे. मात्र वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. रात्री गस्त घालणाऱ्या वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही बाब निदर्शनास आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अंभई गावाच्या हद्दीत कोहोज किल्लय़ाच्या खाली मोठे घनदाट जंगल आहे. खैर, सागवान, शिसम अशी अनेक झाडे या वनक्षेत्रात आहेत. खर तस्करांकडून अनेकदा येथील जंगलात खराच्या झाडांची कत्तल केली जाते. २१ जून रोजी तस्करांनी तीन खराच्या झाडांची कत्तल करून ती पळवली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी रात्री कटरचा वापर करून तीन मोठय़ा खर झाडांची कत्तल करून मनोर-वाडा मुख्य रस्त्यावरून ती लंपास केल्याची घटना घडली आहे. खैराच्या कच्च्या मालाला प्रचंड मागणी आहे. गुटखा व सुगंधित सुपारी बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे जंगलातून छुप्या मार्गाने या झाडांची तस्करी केली जाते. तस्करील केलेला माल गुटखा बनवणाऱ्या कंपन्यात बेकायदा घेत असतात. प्रचंड मागणी असल्याने त्याची चोरटी तस्करी होत असल्याने जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रातील जंगलात अनेक खैर झाडांच्या तस्करी झाल्याच्या घटना घडत आहेत. वन विभागाने खर तस्करांना मोकळीक दिली आहे. जंगलातून शंभरहून जास्त झाडांची कत्तल करण्यात आली आहे. आम्ही सुक्या लाकडांसाठी जंगलात गेलो की वन विभागाकडून आम्हाला पळवून लावण्यात येते. मात्र तस्करांवर काहीच कारवाई होत नाही. - सुधाकर अकरे, शेतकरी, अंभई खैरतोड प्रकरण मला समजले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि लवकरात लवकर तस्करांचा शोध घेतला जाईल. नागरिकांच्या आरोपानुसार वन विभाग कर्मचारी यामध्ये सामील असतील तर त्याचीही पूर्ण चौकशी करून सदोष असल्यास कारवाई प्रस्तावित केली जाईल. - अमितकुमार मिश्रा, उपवनसंरक्षक, जव्हार