दुरुस्तीसाठी धरण पूर्ण क्षमतेने न भरण्याचा निर्णय; चिकू बागायतदारांना मोठा फटका नितीन बोंबाडे, लोकसत्ता डहाणू : डहाणू तालुक्यातील चिकू बागायदार आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेले अस्वाली धरण पूर्ण क्षमतेने न भरण्याचा निर्णय मृदा व जलसंधारण विभागाने घेतला आहे. २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणाचे दगड बांधकाम असून त्याची मोठय़ा प्रमाणात झीज होत असल्याने दुरस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे धरणातील वापरातील पाणीसाठा संपवून मृत पाणीसाठय़ापर्यंत हे धरण रिकामे करावे लागणार आहे. त्याचा मोठा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे झाई बोरीगाव, बोर्डी, रामपूर, घोलवड या गावांतील चिकू बागायतदारांना मोठे परिणाम भोगावे लागणार आहेत. या परिसरात मोठय़ा प्रमाणावर चिकूचे उत्पादन केले जाते. मात्र धरण दुरुस्तीचा निर्णय घेताना प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही आणि पाणीपुरवठय़ाची दुसरी व्यवस्था केली नाही, अशी टीका परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. गेल्या वर्षी टिवरी धरण फुटल्यानंतर शासनाने महाराष्ट्रातील सर्व धरणे तपासण्याचे धोरण अवलंबले. त्यामध्ये डहाणू तालुक्यातील २५ वर्षांपूर्वी दगडी बांधकामांनी उभारलेले अस्वाली धरण, सफाळ्यातील करवाळे धरणातील दगडी बांधकामाच्या किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असल्याचा निर्णय घेण्यात आला. अस्वाली धरणाच्या पाणी सोडण्याच्या दरवाजाच्या भागातील सीमेंटची झीज, इनर व्हील, विंधन विहिरीचे बांधकाम पडल्याने किरकोळ दुरुस्तीची गरज आहे. त्याकरिता उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांनी घोलवड, बोर्डी, झाई-बोरीगाव या ग्रामपंचायतींना १३ मे २०२० रोजी पाणीपुरवठय़ाचे नियोजन व पाण्याचे काटकसरीने वापर करण्याबाबत कळवले होते. त्यानुसार जून, जुलै महिन्यात किरकोळ दुरुस्तीसाठी साठवलेला पाणीसाठा रिकामा करण्यात आला. परंतु धरणाची दुरुस्ती करता आलेली नाही. यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास पाण्याचा दाब वाढून धरणाला धोका संभवण्याची भीती असल्याने पाणी पूर्ण क्षमतेने भरता येणार नाही. तसेच दुरुस्तीसाठी धरण रिकामे करावे लागणार आहे. त्यामुळे यावर्षी २०८३ टीएमसी जलसाठय़ावर पाणी सोडावे लागणार आहे. अस्वाली धरणामुळे बोर्डी, घोलवड, रामपूर, झाई बोरीगाव या भागांत चिकूचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या बागायतदारांना मोठा फायदा होतो. मात्र यंदा त्यांचे नुकसान होणार आहे. पर्यायी व्यवस्थेची मागणी अस्वाली धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास धरणास धोका असल्याचा अहवाल मृदा व जलसंधारण विभागाने दिला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अस्वाली धरणात पाणी न साठवण्याचा शासनाचे धोरण ठरले असताना या धरणात येणाऱ्या नद्यांचे स्रोत अडवून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ यासाठी शासनाने दुसरी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. जेणेकरून या पाटबंधाऱ्यावर पाणी अडून हा त्रास कमी करता आला असता. मात्र शासनाने उदासीन भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास भोगावा लागणार आहे. २५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले अस्वाली धरण मातीचे आहे. त्याचे बांधकाम नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले असून त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. पाणीसाठा वाढल्यास पाण्याच दाब वाढून धोका उद्भवू शकतो. सध्या धरणात १७०० टीसीएम पाणीसाठा आहे. ग्रामपंचायतींना, बागायतदारांना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने कोणतेही नुकसान होणार नाही. - संजय कचरे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी