सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना एका शेतकऱ्याने दोन एकरामध्ये गांजा लावण्यासंदर्भात परवाणगी मागणारं पत्र लिहिलं आहे. अनिल आबाजी पाटील असं पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे राहणाऱ्या पाटील यांनी लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. माझी शिरापूर येथे दोन एकर जमीन असून तिथे मला गांजा लागवडीची परवानगी द्यावी असं पाटील यांनी म्हटलं आहे. मी शेतकरी असून कोणतेही पिक घेतलं तरी त्याला शासनाचा हमी भाव नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही. त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्यावर जमीनीवर दोन एकरात गांजा लागवड करण्याची परवानगी १५ सप्टेंबरपर्यंत लेखी द्यावी नाहीतर मी १६ सप्टेंबर रोजी आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली अशं गृहित धरुन लागवड सुरु करणार आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील, असा उल्लेख या पत्रात आहे. हे पत्र २५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वीकारल्याचा स्टॅम्प त्यावर आहे. पोलीस अधिकक्षकांनाही यासंदर्भातील एक प्रत पाठवण्यात आल्याचा उल्लेख या पत्रावर आहे. जालन्यात मिर्च्या रस्त्यावर. मागील काही दिवसांपासून अचानक कृषी बाजारपेठांमध्ये शेतमालाचा भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र दिसत आहे. टोमॅटो, मिर्च्यांसहीत सर्वच शेतमालाचे भाव घसरले आहेत. जाल्यानमध्ये आठवडाभरात हिरव्या मिरचीचे भाव साडेतीन ते चार हजार रुपयांवरून पाचशे ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई या गावात तसेच जाफराबाद या तालुक्याच्या ठिकाणी हिरव्या मिरचीच्या खरेदी-विक्रीच्या बाजारपेठा आहेत. या दोन्हीही बाजारपेठांमध्ये ठोक खरेदीचे भाव मोठय़ा प्रमाणावर घसरल्याने कांही शेतक ऱ्यांनी मिरच्या रस्त्यावर फेकून दिल्याच्याही घटना घडल्या आहेत. औरंगाबादमध्ये टोमॅटोचा खच. टोमॅटोचे भाव कमालीचे घसरल्याने काढणीचा खर्चही निघत नाही त्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरभर टोमॅटो रस्त्यावर फेकून आंदोलन केले. २५ किलो टोमॅटोसाठी केवळ १०० रुपयांचा दर मिळत असल्याने अडचणीत भर पडू लागली आहे. गंगापूर येथे लासूर स्टेशन परिसरात अलिकडेच टोमॅटो लागवड वाढली असून शेतकरी हैराण झाले आहेत. टोमॅटोचे दर कायम राखायचे असतील तर त्यावरील प्रक्रिया उद्योग उभारणीची गरज आहे. तसे पत्र या भागातील शेतकऱ्यांनी थेट रतन टाटापर्यंतही पाठविले आहे. गंगापूर तालुक्यातील गवळीशवरा, फलशवरा या गावात टोमॅटो लागवड वाढली आहे. जवळपास ३०-४० गावात टोमॅटो लागवड वाढली आहे. या पिकास अंगमेहनत अधिक असते. तसेच काही वेळा कीड नियंत्रणासाठी फवारण्याही कराव्या लागतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो.