प्रश्न चिघळण्याची भीती

सोलापूर विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे, यावरून वाढलेल्या वादातून सोलापूरचे सामाजिक वातावरण गढूळ होत चालले असताना त्याकडे मतांच्या राजकारणापुरते न पाहता योग्य समन्वयाच्या भूमिकेतून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास मराठवाडा विद्यापीठ नामांतरासारखा संघर्ष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोन देशमुखांमधील वादातून नामांतरचा प्रश्न चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

देशात एकमेव सोलापूर जिल्ह्य़ासाठी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने २००४ साली सोलापूर विद्यापीठाची उभारणी झाली होती. विद्यापीठाची गेल्या १३ वर्षांची वाटचाल पाहिली तर या विद्यापीठाला शैक्षणिक विकास तथा स्वत:च्या गुणवत्तेसाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ११८ महाविद्यालये जोडलेले सोलापूर विद्यापीठ हे अजूनही बाल्यावस्थेतच आहे. कामाचा मर्यादित आवाका असूनही या विद्यापीठासमोर अजून पायाभूत विकासाचे प्रश्न आहेत. खरे तर या बाबींकडे प्राधान्याने लक्ष देण्याऐवजी विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे, यावरून वाद वाढविला जात आहे. यात विनाकारण अस्मितेचे आणि पर्यायाने मतपेटीचे राजकारण खेळले जात आहे. त्यामुळे सोलापूरची सामाजिक शांतता व सलोखा धोक्यात येत आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा असाच गाजला होता. सोलापूरमध्ये वेळीच खबरदारी न घेतल्यास नामांतराचा मुद्दा वेगळ्या वळणावर जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते.

सोलापूर विद्यापीठाची उभारणी झाली त्या वेळी सुरुवातीलाच या विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर किंवा महात्मा बसवेश्वर यापैकी एकाचे नाव द्यावे, अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजाच्या धुरिणांनी केली होती. मंत्रालयात शिवा वीरशैव युवक संघटनेने पाठपुरावा केला होता. नंतर त्यांच्या प्राधान्यक्रमात विद्यापीठ नामांतराचा मुद्दा बाजूला पडला. किंबहुना, गेली दहा-बारा वर्षे या मुद्दय़ाकडे वीरशैव लिंगायत समाजाने पाठ फिरविली होती. एकीकडे मंत्रालयात सुरुवातीला पाठपुरावा केला गेला असताना दुसरीकडे विद्यापीठाच्या विद्या परिषदेकडून तद्अनुषंगाने ठराव संमत होणे कायदेशीर गरजेचे होते. परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. मात्र नंतर जेव्हा विद्या परिषदेकडे एक नव्हे विविध समाजाच्या तब्बल २८ संघटनांनी विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे, यासाठी वेगवेगळ्या नावांचा आग्रह धरला, तेव्हा एकंदरीत सामाजिक परिस्थिती लक्षात घेता २००८ साली विद्या परिषदेने नामांतराच्या मुद्दय़ावर सावध भूमिका घेत, विद्यापीठाला सिद्धेश्वर, महात्मा बसवेश्वर, अहिल्यादेवी होळकर व अन्य कोणाचेही नाव देता पूर्वीप्रमाणे सोलापूरचेच नाव कायम ठेवण्याचा ठराव संमत करून शासनाकडे पाठविला होता. या घटनेला पाच वर्षांचा काळ उलटल्यानंतर २०१३ साली पहिल्यांदाच धनगर समाजाने अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडले. मोठे शक्तिप्रदर्शन करीत सर्व समावेश नेत्यांच्या सहभागातून विशाल मोर्चाही काढला होता. त्यानंतर विद्यापीठ नामांतराचा मुद्दा पुन्हा बासनात गुंडाळून ठेवला. तो अलीकडे पुन्हा उकरून काढून धनगर समाजाने पुन्हा दुसऱ्यांदा आंदोलन सुरू केले. धनगर समाजाचे वाढत चाललेले शक्तिप्रदर्शन पाहून वीरशैव लिंगायत समाजाचे डोळे विस्फारले आणि शिवा वीरशैव युवक संघटनेने विद्यापीठ नामांतराचा प्रश्न पुन्हा हाती घेत आपला दावा कायम ठेवला. तोपर्यंत धनगर समाजही आक्रमक झाल्याने त्यांच्याकडून माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता. विद्यापीठाला सिद्धेश्वर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबरोबर माता जिजाऊ यांच्या नावाचा आग्रह मराठा समाजाकडून धरला गेल्याने सामाजिक परिस्थिती चिघळत जात असल्याचे दिसून येते. कारण कोणीही माघार घेण्यास तयार नाही.

समाजातील अंतर्गत वादाची किनार

एकीकडे विद्यापीठ नामांतराचा प्रश्न चिघळत चालला असताना दुसरीकडे ज्या त्या समाजाकडून अस्मितेचे राजकारण खेळले जात असल्याने साहजिकच या तापलेल्या चुलीवर राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न हितसंबंधी राजकीय पुढाऱ्यांकडून होत आहे. यात वीरशैव लिंगायत समाजाअंतर्गत संघर्षांची किनारही लाभली आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख हे वीरशैव लिंगायत समाजाचे आहेत. शिवाय ते गेली नऊशे-हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या देशमुख घराण्याचे असून ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी म्हणून देशमुख घराण्याची ओळख सांगितली जाते. त्यामुळे साहजिकच देशमुख घराण्याला वीरशैव लिंगायत समाजात मान आहे. तीन वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व करणारे विजय देशमुख हे तीन वर्षांपूर्वी प्रथमच मंत्री झाले आणि पाठोपाठ सोलापूरचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडे चालून आले. त्यामुळे त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षाही वाढली आहे. त्यातूनच वीरशैव लिंगायत समाजासाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेले ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराबरोबरच सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडेही त्यांचा डोळा असल्याचे बोलले जाते. सिद्धेश्वर मंदिर समिती व सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ही दोन्ही सत्तास्थळे दिवंगत माजी खासदार अप्पासाहेब काडादी यांचे नातू धर्माराज काडादी यांच्या ताब्यात कायम आहेत. काडादी घराण्याचा वीरशैव लिंगायत समाजात मोठा दबदबा आहे. देशमुख यांची राजकीय चाल विचारात घेऊन मूळ संयमी स्वभावाचे धर्मराज काडादी हेदेखील आता शह-काटशहाचे राजकारण खेळण्यात माहीर झाले आहेत. त्यातून देशमुख-काडादी संघर्ष सुप्त स्वरूपात पाहावयास मिळत आहे.

सोलापूर विद्यापीठ नामांतराचा मुद्दा गाजत असताना त्यातही देशमुख विरुद्ध काडादी यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आला आहे. वीरशैवांच्या मोर्चाप्रसंगी पालकमंत्री देशमुख यांच्यावर काढण्यात आलेला राग हे त्याचेच द्योतक होते. भाजपअंतर्गत स्थानिक राजकारणात पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील शह-काटशहाच्या राजकारणाचीही पाश्र्वभूमी लाभली आहे. साप-मुंगुसाप्रमाणे कमालीचे हाडवैर असल्याप्रमाणे एकमेकांना अडचणीत आणण्याची संधी सहसा न दवडणारे दोघेही मंत्री देशमुख हे सोलापूरला कोठे नेत आहेत, याची मासलेवाईक उदाहरणे दररोजच सोलापूरकर प्रत्यक्ष अनुभवत आहेत. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा हादेखील त्याचाच भाग असल्याचे म्हटले जाते. मात्र ही वस्तुनिष्ठ पाश्र्वभूमी पाहता आता या दोन्ही देशमुखांपेक्षा काँग्रेसचे दिग्गज व अनुभवी नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे. दोन्ही देशमुख हे जेवढे आपापसात भांडतील, तेवढा लाभ सुशीलकुमार शिंदे यांना होऊ शकतो, हे निश्चित.