भारत पाकिस्तान सिमेवर पाकिस्तानी सैन्याद्वारे दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील नाशिकमधील जवान केशव गोसावी शहीद झाले. जम्मूच्या नाओशेरा सेक्टरमध्ये दुपारी २ वाजून ४५ मिनीटांनी पाकिस्तानी सैन्याने गोळीबाराला सुरुवात केली. भारतीय जवानांनीही या हल्ल्याचं जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र या गोळीबारात महाराष्ट्राचे जवान केशव गोसावी हे जखमी झाले. मात्र सैन्याच्या रुग्णालयात उपचार घेत असताना केशव यांची प्राणज्योत मावळली. काल केशव यांच्यावर सिन्नर तालुक्यातील त्यांचे मूळगाव असणाऱ्या शिंदेवाडी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बोलताना केशव यांच्या मामांनी सीमेवर फक्त गोरगरिबांच्या मुलांनीच का मरायचं? असा सवाल उपस्थित केला. केशव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर 'न्यूज १८ लोकमत' या वृत्तवाहिनीशी बोलताना केशव यांच्या मामांनी आपला संताप व्यक्त केला. सीमेवर फक्त गोरगरिबांच्या मुलांनीच का मरायचं?, असा सवाल करतानाच त्यांनी नेते आणि अधिकाऱ्यांच्या मुलांचे सैन्यातील योगदानावर प्रश्न उपस्थित केला. नेते आणि अधिकाऱ्यांची मुलं कधी सैन्यात भरती होणार अशी उद्विग्न प्रतिक्रिया केशव यांच्या मामांनी दिली. शहिद २९ वर्षीय गोसावी हे नाशिक जिल्ह्यातील श्रीरामपूरचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा गोसावी हा त्यांचा परिवार आहे. केशव यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासहीत राजकीय आणि समाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी केशव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. महाजन यांनी शहीद केशव गोसावी यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. यावेळी केशव यांची पत्नी यशोदा यांनी आपल्या पतीच्या निधनाचे उत्तर गोळीने देण्याची मागणी केली. गिरीश महाजन यांनी केशव गोसावी यांच्या कुटुबीयांना राज्य सरकारतर्फे २५ लाखांची मदत देण्यात येईल अशी घोषणा यावेळी केली.