अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. “माझ्या राजीनाम्याचा पुडया सोडण्यात आल्या. मी राजीनामा दिला असे ज्यांनी तुम्हाला सांगितले त्यांनाच तुम्ही विचारा” असे अब्दुल सत्तार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आज सकाळी सर्वप्रथम समोर आले होते. त्यानंतर दिवसभर त्यांच्या राजीनाम्यावर चर्चा सुरु होती. तब्बल नऊ तासांनी सत्तार यांनी माध्यमांसमोर येऊन आपल्या राजीनाम्याची पुडी सोडण्यात आल्याचे स्पष्ट केले.

“मी आता कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. मी माझी भूमिका पक्षप्रमुखांसमोर मांडेन. मी योग्यवेळी उत्तर देईन. माझ्याबद्दल कोण काय बोलले त्याची सर्व माहिती मी पक्षप्रमुखांना देईल. माझ्या राजीनाम्याच्या पुडया सोडण्यात आल्या. माझा सर्व कंट्रोल मातोश्रीवर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करुन मी तुमच्याशी बोलीन” असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

खैरे संतापले, अब्दुल सत्तार गद्दार 
औरंगाबाद जिल्हापरिषद निवडणूक निकालानंतर संतापलेल्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सत्तार यांच्यावर कडाडून टीका केली. अब्दुल सत्तार हे गद्दार आहेत, त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका असं वक्तव्य खैरे यांनी केलंय. सत्तारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेचा उपाध्यक्ष पदाचा उमेदवार पडला, त्यामुळे सत्तारांवर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी खैरेंनी केली.