शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना सेनापदक दिलं जाणार आहे. उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आलं. त्यांच्या शौर्याचा गौरव मरणोत्तर सेना पदक देऊन केला जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच ही घटना घडली होती. कौस्तुभ राणे यांना मागच्याच वर्षी नियंत्रण रेषेजवळ केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक देण्यात आले होते. तसेच त्यांना मेजर हा हुद्दा देऊन लष्करात बढतीही देण्यात आली होती. मात्र गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना ते शहीद झाले.

 

मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या वैभववाडी येथील सडुरे गावचे राणे कुटुंब १९९० मध्ये मीरा रोडच्या शीतलनगर येथील हिरल सागर या इमारतीत रहायला आले. कौस्तुभचे शालेय शिक्षण मीरा रोडच्या होली क्रॉस शाळेत झाले. लहानपणापासूनच अतिशय हुशार असलेल्या कौस्तुभने शालेय जीवनातच सैन्यात जायचे नक्की केले होते. लष्करी शिक्षण पुण्यात पूर्ण केल्यानंतर २०१० मध्ये त्यांनी कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली आणि चेन्नई येथे अधिकारी प्रशिक्षण पूर्ण केले. ऑक्टोबर २०११ मध्ये लेफ्टनंट या पदावर ते लष्करी सेवेत रुजू झाले. २०१३ मध्ये त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली आणि २०१८ मध्ये मेजर पदावर कार्यरत होते. मात्र दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आले.

कौस्तुभ यांचे वडील खासगी कंपनीत नोकरीला होते, सध्या ते निवृत्त झाले आहेत. त्यांची आई निवृत्त शिक्षिका आहेत. काश्मीरमध्ये बदली होण्याआधी ते कोलकाता येथे आपल्या पत्नीसह रहात होते. मात्र काश्मीरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपली पत्नी आणि मुलाला आई वडिलांकडे मीरारोडला रहायला पाठवले होते. एप्रिल २०१८ मध्येच त्यांनी कुटुंबाची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर बातमी आली ती त्यांच्या जाण्याचीच. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते.  त्यांच्या शौर्याचा गौरव सेना पदक देऊन केला जाणार आहे.