शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये म्हणून तिसरीतल्या एका मुलाने एक कविता रचली. पण आपल्या आयुष्यात काय वाढून ठेवलं आहे हे त्या मुलाला कुठे ठाऊक होतं? ज्या मुलाने ही कविता वाचली त्याच्याच वडिलांनी संध्याकाळी विष प्राशन करुन आत्महत्या केली. पाथर्डी तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या ठिकाणी हनुमान नगर येथे तिसरीच्या वर्गात प्रशांत बटुळे हा विद्यार्थी शिकतो. बुधवारी प्रशांत बटुळेने आपल्या वर्गात एक कविता सादर केली. शेतकऱ्याने आत्महत्या करु नये म्हणून ही कविता त्याने रचली होती. मात्र त्याच रात्री त्याचे वडील मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. प्रशांतच्या कवितेतल्या काही ओळी शेतात कष्ट करुनही तुझ्या डोक्याला ताप, बळीराजा नको करु आत्महत्या.. पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरे, कसे उन्हात करतात शेती, पिक उगवणी करुन मिळतात पैसे शेती करुनही तुझ्या हाताला फोड अरे बळीराजा नको करु आत्महत्या