अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील बहुचर्चित तिहेरी हत्याकांडाप्रकरणी नाशिकमधील सत्र न्यायालयाने सोमवारी निर्णय दिला. न्यायालयाने सात पैकी सहा जणांना दोषी ठरवले असून दोषींच्या शिक्षेवर १८ जानेवारीरोजी सुनावणी होणार आहे.

जानेवारी २०१३ मध्ये सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे संदीप राज धनवार (वय २४), राहुल कंडारे (वय २६), सचिन घारू (वय २३) या दलित मेहतर समाजातील तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. हे तिघे तरुण नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले आणि त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सचिन घारुचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते आणि याच रागातून सहा ते सात जणांनी हत्या केली होती. या प्रकरणातील एका आरोपीला सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त करण्यात आले.

प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना या प्रकरणात अटक झाली होती. यातील अशोक फलकेला न्यायालयाने दोषमुक्त केले. तर उर्वरित सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले.

सोनईतील तिहेरी हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली होती. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस तपासात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवला. घटना घडल्याच्या दोन दिवसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. दलित संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शेवटी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला होता.