जवळपास १७५ वर्षांची परंपरा असलेल्या मराठी रंगभूमीबाबतच्या देखाव्याला केंद्र सरकारने गणतंत्र दिवसाच्या परेडमध्ये समाविष्ट करायला नकार दिला. मात्र या नाट्यपरंपरेचा एक आगळावेगळा गौरव लवकर होणार आहे. १८४३ हे वर्ष म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामधला एक मैलाचा दगड. विष्णुदास भावे यांनी संगीत सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग सांगलीला करून मराठी रंगभूमीचा पाया रचला. नंतरच्या काळात गोविंद बल्लाळ देवल, बालगंधर्व, अण्णासाहेब किर्लोस्कर, जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या धुरीणांनी संगीत नाटक व संगीत रंगभूमीला एका वेगळ्याच शिखरावर नेले. संगीत शारदा, शाकुंतल, कट्यार काळजात घुसली, घाशीराम कोतवाल, मोरूची मावशी यांच्यासारख्या नाटकांनी रसिकांच्या मनाचा वेध घेतला आणि समाजाच्या स्थितीवर भाष्य केले, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कीचक वध सारख्या नाटकाने स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय विचार सर्वसामान्यांसमोर मांडले. महाराष्ट्राच्या या महत्वाच्या व १७५ वर्षे पूर्ण झालेल्या परंपरेचा एक लिखित दस्तऐवज लवकरच रसिकांच्या हातात पडेल. महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर विभागातर्फे पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या संगीत रंगभूमीवर तीन खंडा वर लवकरच काम सुरू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वैभवशाली संगीत नाट्य परंपरेचे जतन व संवर्धन होईल व त्याच्या सुवर्ण स्मृतींनाही उजाळा मिळेल. दिलीप बलसेकर, कार्यकारी संपादक व सचिव महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर, यांनी असे सांगितले की लवकरच मंत्री, सांस्कृतिक कल्याण, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कामाला गती देण्यात येईल. "पहिला खंड हा १८४३ ते १८७९ व १८८० ते १९३२ पर्यंतच्या कालखंडावर असेल. यात विष्णुदास भावे, भावे कालीन नाटके, यक्षगान, बुकिष नाटक, फार्स, पारसी, गुजराती, कानडी रंगभूमी, व सोकर बापू त्रिलोकेकर या विषयावर असेल. दुसरा खंड १९३३ ते १९५९ या या कालखंडावर व मामा वरेरकर, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मो गा रांगणेकर यांच्या पर्वावर असेल. १९६० ते २०१९ पर्यंतचा कालखंड हा तिसऱ्या खंडात असेल आणि विद्याधर गोखले तसंच साठोत्तर रंगभूमी. वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर या नाटककरांचे योगदान मांडेल. या तिन्ही खंडांमध्ये छायाचित्रं असतील व व या तिसऱ्या खंडा सोबत दृकश्राव्य सीडीचा ही समावेश असेल," अशी माहिती बलसेकर यांनी दिली.