अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांप्रमाणे पार पडावी आणि राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली.

अकरावी प्रवेशाकरिता कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर विहित कोट्यातील राखीव जागांवर करण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेवर तसेच एकूण प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी हे विशेष भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या या भरारी पथकामधे विभाग स्तरावरील केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतील कोणतेही दोन सदस्य तसेच विभागातील अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधी अथवा प्राचार्य, संबंधित शिक्षणाधिकारी अथवा शिक्षण निरीक्षक यांचा या भरारी पथकामध्ये समावेश असणार आहे.

यापूर्वी 2019-20 पासून नववी ते बारावीची विषयरचना आणि मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती 10 दिवसांमध्ये अहवाल सादर करणार असून शिक्षण आयुक्त या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. विद्या प्राधिकरणाचे संचालक, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव, माध्यमिक शिक्षण संचालक, बालभारतीचे संचालक आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष या समितीचे सदस्य असणार आहेत.