करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहू शकणार होते. मात्र आता, विद्यार्थांनी निकालाच्या साईटवर गर्दी केल्याने साइट क्रॅश झाली आहे. त्यामुळे निकाल जाहीर होऊनही तो पाहता येत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागले आहेत. लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकाच वेळी निकाल पाहत असल्याने या साईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आल्याने हा प्रकार झाला आहे.

दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून अधिक वेळ झाला तरी डाऊनच आहेत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे.

दहावीच्या निकालाच्या result.mh-ssc.ac.in आणि mahahsscboard.in या वेबसाईट सुरुवातीला डाऊन होत्या. मात्र थोड्यावेळापूर्वी त्या पुन्हा त्या सुरु झाल्या होत्या. काही वेळातच त्या पुन्हा डाऊन झाल्या. दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

दरम्यान, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने यंदा निकालासाठी result.mh-ssc.ac.in ही नवी लिंक बोर्डाने दिली आहे. यासोबतच बोर्डाची नेहमीची अधिकृत लिंक http://www.mahahsscsscboard.in येथेही निकाल पाहता येईल, असे बोर्डाने गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले होते. मात्र दुपारी १ वाजल्यापासून या दोन्ही लिंकवर जाऊन निकाल पाहण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर साईट डाऊन असल्याने विद्यार्थी, पालक त्रस्त झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावी चा निकाल जाहीर आज शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्यात नऊ विभागीय मंडळाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. सर्वात जास्त निकाल १०० टक्के कोकण विभागाचा लागला असून सर्वांत कमी निकाल ९९.८४ टक्के नागपूर विभागाचा आहे.

राज्यातील नऊ विभागांचा ९९.९५ टक्के निकाल लागला आहे. यापैकी कोकण विभागाचा १०० टक्के, अमरावती ९९.९८ टक्के, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर या विभागांचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के तर सर्वात कमी ९९.८४ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.