आपल्या मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. कराडजवळील ओगलेवाडी येथील एसटी कंडक्टरने पत्नीसोबत रेल्वेखाली उडी मारुन जीवनयात्रा संपवली. बबन पवार आणि कल्पना पवार असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बबन पवार यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती.  या मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केला. शुक्रवारी मुलीने फोन करुन आई वडिलांना लग्न केल्याचे सांगितले. मुलीच्या या कृत्यामुळे समाजात बदनामी होईल, या भीतीने बबन यांनी पत्नीसोबत रेल्वेखाली उडी घेतली. बबन पवार हे कराड एसटी आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत होते. मोठ्या मुलीशिवाय त्यांना ९ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा एक मुलगा आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.