बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील आणखीन एका नावाची भर पडली आहे. हे नाव म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले आहेत की ते आता वेडे झाले आहेत असे धक्कादायक विधान रावते यांनी केले आहे. औरंगाबाद येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले.

औरंगाबादमध्ये शहरांतर्गत बससेवा सुरु करण्यासाठी औरंगाबाद सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळादरम्यान एक करार करण्यात आला. यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रावतेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हे बेताल विधान केले. एसटी महामंडळामध्ये पगाराचे, कामाचे असे अनेक प्रश्न असल्याचे सांगत पत्रकरांनी प्रश्न विचारला असला रावतेंनी अगदी अहंकारी भाषेत हे प्रश्न उडवून लावणारे उत्तर दिले. ‘कुणी सांगितलं तुम्हाला. कुठल्या सालात जगता आपण? नाही कुठल्या सालात जगता आपण एवढचं विचारायतोय मी तुम्हाला. कारण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेत. आणि ते एवढे वाढले आहेत की तेच आता वेडे झाले आहेत. आणि मी हे अधिकृतपणे बोलतोय’ असं उत्तर रावतेंनी दिले. या वक्तव्यामुळे रावतेंवर चहूबाजूने टिका होताना दिसत असून यामधून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

वाचा >> दिवाळीत एसटीचा प्रवास महागणार, १ ते २० नोव्हेंबर दरम्यान १० % भाडेवाढ

औरंगाबाद सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळादरम्यान झालेल्या करारानुसार येत्या डिसेंबर महिन्यापासून औरंगाबाद शहरात १०० बसेस धावणार आहेत. दिवकर रावतेंच्या उपस्थितीमध्ये हा करार करण्यात आला. याच वेळी बोलताना त्यांनी होणारा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ लवकरच रेल्वेप्रमाणे मालवाहतूकीची सेवा सुरु करणार असल्याची माहिती दिली.