गणित विषयातील सर्वोत्तम रत्न म्हणजे भास्कराचार्य होत. त्यांनी गणितासह खगोलशास्त्रासह अनेक ज्ञानशाखांमध्ये दिलेले योगदान बहुमोल आहे. त्यांच्या कार्याने ओळखल्या जाणाऱ्या पाटणादेवी परिसराची ओळख गणित नगरी होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. चाळीसगाव येथे शुक्रवारी आयोजित भास्कराचार्य यांच्या कार्य परिचय संमेलनाचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात तावडे यांनी मार्गदर्शन करताना आ. उन्मेश पाटील यांनी आखलेल्या गणित नगरीच्या संकल्पनेचे कौतुक केले. चाळीसगावात उमंग सक्षम युवा प्रकल्पाचे आयोजन आ. पाटील यांनी केले होते. या प्रसंगी उमंग समाजशिल्पी सृष्टी कौशल्य विकास व युवा प्रकल्प पुस्तिकेचे प्रकाशन तावडे, खा. ए. टी. पाटील, आ. पाटील, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याने अशा कार्यक्रमाचा आदर्श राज्यातील इतरांनीही घेण्याचे आवाहन तावडे यांनी केले. शिक्षकांवर येणारा अतिरिक्त कामाचा ताण लवकरच बंद करण्यात येईल, परंतु शिक्षकांनी पूर्ण वेळ शाळेत देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खा. ए. टी. पाटील यांनी ८ ते १० डिसेंबरदरम्यान जळगाव जिल्ह्य़ात बालसाहित्य संमेलन आयोजित केले जाणार असल्याची माहिती दिली. या वेळी व्यासपीठावर आ. स्मिताताई वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ हेही उपस्थित होते.