यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी येथे राज्यस्तरीय बंजारा लेगी महोत्वस मोठया थाटात संपन्न झाला. १४ व १५ मार्च अशा दोन दिवसीय या महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीरावज मोघे यांच्या हस्ते करण्यात आले. विदर्भ, मराठवाडा, खान्देश व आंध्रप्रदेशातुन सुमारे ४६ संघांनी या महोत्सवात भाग घेतला होता. नवीन बाजार समितीच्या प्रांगणात हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बंजारा कवी प्रेमदास महाराज (वनोलीकर) प्रामुख्याने उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून बंजारा समाजाचे नेते रामजी आडे, आर.डी.राठोड, एन.टी.जाधव, राजुदास जाधव, शंकर राठोड, विजय चव्हाण, धनसिंग राठोड, डॉ.रामचरण चव्हाण, प्रदीप राठोड, गिरीश नाईक यांचेसह पांढरकवडय़ाचे नगराध्यक्ष शंकर बडे, घाटंजीचे माजी नगराध्यक्ष किशोर दावडा, आर्णीचे नगराध्यक्ष अनिल आडे व स्वागताध्यक्ष भारत राठोड व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक अनिल आडे यांनी केले. दिवं. वसंतराव नाईक जन्मशताब्दीनिमित्य आयोजित या राज्यस्तरीय लेंगी महोत्सवात बंजारा समाजात जनजागृती, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, तसेच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. विदर्भ, मराठवाडा, खान्देश व आंध्रप्रदेशातुन सुमारे ४६ संघांनी या महोत्सवात भाग घेतला होता. त्यात महिला संघ २५, तर पुरुष संघ २१ सहभागी झाले होते. या संघांनी विविध विषयांवर जनजागृती करण्यासाठी व संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने बंजारा समाजाच्या परंपरागत वेषभूषेत महिलांनी डफडे वाजवून लेंगी सादर केल्या. विशेष म्हणजे, पुरुष संघांनी समाज परिवर्तनाच्या दृष्टीने सेवादास महाराज, दिवं. वसंतराव नाईक यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. या महोत्सवात पुरुष संघासाठी ४१ हजारासह ५ बक्षीस, तर महिला संघांसाठी २१ हजारासह ५ बक्षीसे या महोत्सवात ठेवण्यात आले होते. यात सहभागी होण्यासाठी मोठय़ा संख्येने समाज बांधवांनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘बंजारा समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित झालेले रामजी आडे यांचा शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील यशस्वी कामगिरीबद्दल अविनाश पवार, निलेश राठोड, राजु चव्हाण यांनाही सन्मानित करण्यात आले.