मंदार लोहोकरे

राज्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला बळ दे तसेच मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे, असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठ्ठलाकडे घातले आहे. कार्तिकीवारीनिमित्त शासकीय महापुजेला पाटील यांनी सपत्नीक हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विठ्ठलाजवळ आपण व्यक्त केलेल्या भावना सांगितल्या.

पाटील म्हणाले, राज्याला दुष्काळातून बाहेर पाडण्यासाठी बा विठ्ठला आम्हाला बळ दे असे साकडे आपण विठ्ठल रुक्मिणी मातेला घातले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची आवश्यक कायदेशीर कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. हे आरक्षण न्यायालयात टिकू दे अशी प्रार्थनाही आपण विठ्ठलाकडे केली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करेल, वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी शासन निधी देईल, असेही ते यावेळी म्हणाले.

या महापुजेला कोल्हापूर जिल्ह्यातील मळगे (बु) येथील बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि आनंदी बाळासाहेब मेंगाणे या दर्शन रांगेतील पहिल्या वारकरी दाप्म्त्याला शासकीय महापुजेचा मान देण्यात आला. दरम्यान, एकादशी सोहळ्यासाठी लाखो वैष्णवासह वरुणराजाने देखील हजेरी लावली. सोमवारी पहाते पडलेल्या पावसाने वारकऱ्यांची तारांबळ उडाली. कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पहाटे नित्यपूजा झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापुजा केली. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.