त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे बुधवारीही दगडफेक करण्यात आल्यामुळे वातावरण तणावपूर्ण आहे. पोलीसांनी गावात कडेकोट बंदोबस्त ठेवला असला, तरी संतप्त जमावाकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये १८ पोलीस जखमी झाले आहेत. तरूणाची हत्या होऊनही पोलीस यंत्रणा संशयितांना अभय देत असल्याची समजूत झाल्याने संतप्त जमावाने मंगळवारी हरसूल येथे दुकाने व घरांची तोडफोड करत आग लावली. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला. कुंभमेळ्याच्या बंदोबस्तात अडकलेल्या पोलीस यंत्रणेची या घटनेमुळे एकच धावपळ उडाली. या घटनेनंतर हरसूलमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मागील आठवडय़ात बोंढारमाळ येथील भागिरथ चौधरी याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. ही विहीर एका समाजातील व्यक्तीच्या शेतात असल्याने दुसऱ्या समाजात वेगळीच भावना निर्माण झाली. तेव्हापासून धुमसत असलेल्या असंतोषाचा उद्रेक दंगलीत झाल्याचे सांगितले जाते. (संग्रहित छायाचित्र)