वाढवण बंदर विरोधात किनारपट्टी परिसरात कडकडीत बंद

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर विरोधी किनारपट्टी बंदला पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मच्छीमार वस्त्या असलेल्या जिल्ह्यातील झाई ते दातीवरेपर्यंतचा परिसर १०० टक्के बंद होता.

पालघर जिल्ह्यात वाढवण येथे बंदर उभारल्यास येथील मच्छीमार, स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी, आदिवासी, बागायदार देशोधडीला लागेल अशी भीती जिल्ह्यातील किनारपट्टी भागात व्यक्त करण्यात येते. या भावना सरकापर्यंत पोहोचवण्यासाठी पालघर जिल्हा व मुंबई जिल्ह्यातील सर्व मच्छीमारी गावाने मंगळवारी हा कडकडीत बंद पाळला. बंदमध्ये मच्छीमार गावांनी सर्व प्रकारची उलाढाल बंद ठेवली होती तर काही ठिकाणी बंदराला विरोध दर्शवण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. काही गावांमध्ये मानवी साखळी उभी करून विरोध दर्शविला. काहींनी मुंडन करून या प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे दाखवून दिले. मच्छीमार गावांतील बहुतांश आस्थापने बंद ठेवून बंदराला प्रखर विरोध दर्शविला गेला. काही रिक्षा,टेम्पो चालक मालक संघटना यांनीही बंदला पाठिंबा दिला. झाईपासून दातीवरे ते थेट भाऊचा धक्का येथील घाऊक व किरकोळ मासळीबाजार, सुक्या मासळीचा व्यवहार, मच्छीमार संस्थांचे व्यवहार, मासेमारी बंद ठेवण्यात आली. त्याचप्रमाणे अनेक गावांमधील नागरिकांनी कामावर न जाता गावात राहून बंदराच्या विरोधात रॅली व मोर्चाचे आयोजन केल्याचे दिसून आले. या किनारपट्टीच्या गावांमध्ये जाणाऱ्या रिक्षा बससेवादेखील अनेक ठिकाणी बंद ठेवण्यात आली होती.

पालघर तालुक्यात दातिवरे, एडवण, केळवा, माहीम, सातपाटी, दांडी,उच्छेली, नवापूर,मुरबे आदी गावांनी कडकडीत बंद पाळला. मच्छीमार महिलाही मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरत बंदराला विरोध दर्शवीत असल्याचे पहावयास मिळाले. या गावांमधील सुमारे साडेचारशे ते पाचशे मच्छीमारी नौका मासेमारीला न जाता बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील आमदारही या बंदमध्ये सहभागी झाले होते. नागरिकांच्या भावना सरकापर्यंत पोचविण्यासाठी आमदारांनी वाढवण बंदर रद्द कराच्या घोषणाबाजी करत विधान भवनासमोर निदर्शने केली.

विरोध कायम

पालघर : बंदरामुळे पालघर जिल्ह्यातील मच्छीमार, शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. या भागात यापूर्वी पाच ते सहा प्रकल्प लादले गेले असून त्यामुळे स्थानिकांची काय गत झाली हे सर्वाना माहीत आहे. त्यामुळे वाढवण बंदराला  आपला विरोध कायम असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी पालघरमध्ये पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.  अलिबाग कॉरिडॉर, मुंबई—वडोदरा द्रुतगती मार्ग, समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग, पश्चिम रेल्वेचे चौपदरी करण, बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग तसेच तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्प, रिलायन्स गॅस लाइन प्रकल्प असे अनेक प्रकल्प या भागात कार्यरत असून स्थानिकांच्या जमिनी अशा प्रकल्पांमध्ये गेल्या आहेत. त्यांचे काय  विकास झाला याकडे गावित यांनी लक्ष वेधले.

डहाणूत निदर्शने

डहाणू :  डहाणू किनारपट्टीवरील चिंचणी, वरोर, वाढवण, गुंगवाडा, डहाणू, आगर, नरपड, बोर्डी, झाईपर्यंत बाजारपेठा तसेच दुकाने बंद ठेवून सरकारी धोरणाचा निषेध करण्यात आला. वाढवण येथे निदर्शने करण्यात आली.  संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृति समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्य.सहकारी संघ लि., ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना  बंदमध्ये सहभागी होते.   बंदरासाठी समुद्रात भराव करण्याकरीता  लागणारा दगड, मुरुम, माती  काढू देणार नाही,  पर्यावरणाचा विनाश करणारे वाढवण बंदर होवू देणार नाही असा ठाम निर्धार आदिवासी एकता परिषदेने केल्याचे राज्य सचिव डॉ. सुनिल पऱ्हाड यांनी सांगितले.

वसई-विरारमधील कोळीवाडय़ांत उत्स्फूर्त प्रतिसाद

वसई : पालघर जिल्ह्यात तयार करण्यात येणाऱ्या वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी मुंबई कफ परेडपासून ते झाईपर्यंतच्या किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या मच्छीमारांनी मंगळवारी कडकडीत बंद पुकारला होता. या पुकारलेल्या बंदला वसई-विरारमधील कोळीवाडय़ातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये मासळी बाजार, गावातील दुकाने व इतर सर्व दैनंदिन व्यवहार बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मंगळवारी पुकारलेल्या या बंदमध्ये वसईच्या अर्नाळा कोळीवाडा, नायगाव कोळीवाडा, पाचूबंदर, वसई कोळीवाडा यांसह इतर सर्व भागांतील मच्छीमार बांधव व मच्छीमारांच्या सामाजिक संस्था यात एकत्रित जमले होते.

विरारजवळील अर्नाळा येथील कोळीवाडय़ातील मच्छीमार बांधव व कोळी महिलांनी या विरोधात गावातून अर्नाळा किनारपट्टीपर्यंत प्रभात फेरीही काढण्यात आली होती. या वेळी ‘एकच जिद्द वाढवण बंदर रद्द’च्या घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी समुद्र किनाऱ्यावर मोठय़ा संख्येने नागरिक एकत्र जमले होते.

वाढवण बंदर प्रकल्प हा आमच्या मच्छीमार बांधवांना उद्ध्वस्त करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आमच्या सर्व मच्छीमार बांधवांचा अखेपर्यंत विरोध आहे. सरकारने येथील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार बांधवांचा विचार करून हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी आम्ही करीत आहोत.

मोरेश्व्र वैती, मच्छीमार नेते