विदर्भात अनेक ठिकाणी पारा ४७ अंशांच्या पुढे पोहोचला आहे. चंद्रपूर येथे रविवारप्रमाणेच सोमवारीही ४७.९अंश सेल्सियस पाऱ्याची विक्रमी नोंद करण्यात आली. मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात विदर्भातील सर्वच शहरे अक्षरश: होरपळून निघत असून दुपारी कडक उन्हं तापल्याने रात्रीही प्रचंड उकाडा होत आहे. रात्रीचे किमान तापमान २९ ते ३२ अंश सेल्सियस दरम्यान राहत असल्याने कुलर आणि एसीत राहणाऱ्यांनाही उन्हाचा तडाखा जाणवत आहे. अमरावतीतही पाऱ्याचा उच्चांक ४७.८ हा उच्चांक नोंदवला गेला. नागपूर (४७.५), ब्रह्मपुरी (४७.४), वर्धा (४७.२) येथील आकडेही छातीत धडकी भरवणारे ठरत आहेत. अकोला ४६.३, गोंदिया ४६.१, यवतमाळ ४५.५, वाशीम ४४ असे तापले आहे. कडाक्याच्या उन्हामुळे जनजीवनावर परिणाम जाणवू लागला असून दुपारी रस्ते अक्षरश: सुनसान पडलेले दिसू लागले आहेत. लोक उन्हात बाहेर पडणे टाळत असून गाडय़ांचे चालक डोक्याला दुपट्टा बांधून मगच गाडय़ा चालवत आहेत.
जंगलातील वन्यप्राण्यांच्या जीवनालाही उन्हाचा तडाखा बसला असून जागोजागी पाणवठे आटल्याने प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. माकडे आणि पक्षी पाणवठे हेरत फिरल्यानंतर बाकी वन्यजीव त्या दिशेने वळू लागल्याचे सर्वच जंगलांमधील सार्वत्रिक चित्र आहे.  
टँकरने पाणीपुरवठा
विदर्भातील तिन्ही व्याघ्र प्रकल्पांमधील पाण्याची स्थिती गंभीर असल्याने प्राण्यांसाठी कोरडय़ा पाणवठय़ांमध्ये टँकरने पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मराठवाडय़ात पारा ४५.५ अंशांवर
नांदेड- नांदेडकरांनाही सोमवारी कडाक्याच्या उन्हाने भाजून काढले. येथे तापमान ४५.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या ३ दिवसांपासून तापमानाची तीव्रता दिवसागणिक वाढत चालली आहे. परभणी येथे ४४.२ अंश, तर औरंगाबाद येथे ४१.९ अंशांची नोंद झाली. सूर्य प्रचंड आग ओकत असल्याने प्रमुख रस्त्यांवर संचारबंदीसदृश चित्र, तर बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. शहरालगतच्या नवीन वसाहतीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणले असताना उन्हाच्या तीव्रतेचा फटकाही सहन करावा लागत आहे.