चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने न विचारता दोन बिस्किटं खाल्ली म्हणून संस्थाचालकाने त्या विद्यार्थ्याला डोकं फुटेपर्यंत मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात हा अमानुष प्रकार घडला आहे.

निरंजन सतीश जाधव असं या विद्यार्थ्याचं नाव असून सिल्लोड तालुक्यातील निल्लोडच्या माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात हा प्रकार घडलाय. पाच रुपयांचा बिस्किटचा पुडा न विचारता घेऊन त्यातील दोन बिस्किटं खाल्ली म्हणून आरोपी संस्थाचालकाने निरंजनला स्पिकरच्या वायरने अमानुष डोकं फुटेपर्यंत मारलं.

11 जुलैला निरंजनला मारहाण झाली. मात्र,  डोकं फुटलेलं असतानाही त्याच्यावर कुठलेही उपचार करण्यात आले नाहीत. तीन दिवसांपूर्वी 14 जुलैला निरंजनचे पालक त्याला भेटायला गेल्यावर सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. घटना ऐकून त्यांना धक्काच बसला, मुलाला अशा अवस्थेत पाहून त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. त्यानंतर पालकांनी निरंजनला घरी नेलं आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संस्थाचालक महाराज रामेश्वर महाराज पवार विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतलं आहे.