खदानीतील पाण्यात मित्रांसमवेत पोहोण्यास गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी तालुक्यातील बिटुर्ली येथे घडली. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उमेश एकनाथ गांगुर्डे (१४, पिंपळद, त्र्यंबकेश्वर) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. नववीत शिक्षण घेणारा उमेश सुटीत बिटुर्ली येथे मामाच्या गावी आला होता. सकाळी तो मित्रांसमवेत गावालगत असलेल्या दगडांच्या खदाणीच्या खड्डय़ात पोहोण्यासाठी गेला. या वेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. मित्रांनी आरडाओरड करून नातेवाईक व ग्रामस्थांना बोलावले. अध्र्या तासाच्या प्रयत्नानंतर त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. परंतु, तत्पुर्वीच त्याचे निधन झाले.