शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत उलटा कल पुणे : गेली काही वर्षे शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहत असताना यंदा या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत उलटा कल पाहायला मिळत आहे. यंदा प्रवेश प्रक्रियेमध्ये जागा कमी आणि विद्यार्थी अधिक असे चित्र असून, या अभ्यासक्रमासाठी इच्छुक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे. सध्या पदवीनंतरच्या शिक्षणशास्त्र (बीएड) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. गेली काही वर्षे शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या जागा पुरेशा प्रवेशाअभावी रिक्त राहत असल्याचे दिसून येत होते. शिक्षक भरतीच्या आकृतिबंधात करण्यात आलेला बदल, शिक्षक भरतीवरील सरकारचे र्निबध, संचमान्यता पद्धती आदी कारणांनी नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यात असंख्य अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर, शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली होती. यंदाही तसेच चित्र असेल असा अंदाज व्यक्त केला जात असताना अनपेक्षित रीत्या उलटा कल दिसून येत आहे. उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी याविषयी माहिती दिली. ‘पुढील वर्षी २०१९-२० पासून शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम चार वर्षांचा करण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. त्यामुळे प्रचलित दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ही अखेरची प्रवेश प्रक्रिया आहे. पुढील वर्षीपासून या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना बारावीनंतर प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे पदवीनंतर या अभ्यासक्रमानंतर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना पुन्हा चार वर्षे द्यावी लागतील. या पाश्र्वभूमीवर, दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे,’ असे खताळ यांनी स्पष्ट केले. ‘राज्यात गेल्या वर्षी ३४ हजार ५०० जागा उपलब्ध होत्या. यंदा त्यातील काही जागा कमी झाल्या, तरी प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच जास्त आहे. त्यामुळे यंदा जागा नक्कीच रिक्त राहणार नाहीत,’ असेही त्यांनी सांगितले. * उपलब्ध जागा - ३४ हजार ५०० * आलेले अर्ज - ५३ हजार ५०९ * प्रवेश परीक्षा दिलेले विद्यार्थी - ४८ हजार ४३६