जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि ग्राम बाल संरक्षण समिती यांच्या प्रयत्नाला यश पालघर : पालघर तालुक्यातील मनोरजवळील आकेगव्हाण (निस्कटेपाडा) बोरशेती या गावात १७ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखण्यास जिल्हा बाल संरक्षण समिती व ग्राम बाल संरक्षण समितीला यश आले आहे. संबंधित मुलीला बालगृहामध्ये दाखल करण्यात आले आहे. मूळ वसई येथे वास्तव्य करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीचा विवाह २२ वर्षीय मुलासोबत २८ एप्रिल रोजी रोजी दीड वाजता होणार आहे, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला वसई येथील एका सेवाभावी संस्थेकडून प्राप्त झाली. या विवाहाच्या अनुषंगाने लग्नपत्रिकादेखील वितरित करण्यात आल्या होत्या. जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य सरपंच व पोलीस पाटील यांच्या मदतीने बुधवारी साडेअकरा वाजताच्या सुमारास विवाहस्थळी पोहोचून बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि ग्राम बाल संरक्षण समितीमार्फत हा विवाह थांबवण्यात आला. या प्रकरणातील दोन्ही पक्षांकडील व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले असून हा बाल विवाह थांबवण्याबाबत त्यांच्याकडून लेखी जबाब घेण्यात आले. संबंधित अल्पवयीन बालिकेला बाल कल्याण समितीच्या आदेशाने बालगृहात काळजी व संरक्षणार्थ दाखल करण्यात आले आहे. हा बाल विवाह थांबवण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी, चाइल्ड लाइनचे सहकारी, पोलीस कर्मचारी, गावाचे सरपंच, पोलीस पाटील व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.