ठाकरे सरकारची वाटचाल ही महाराष्ट्राची वाट लावणारी वाटचाल आहे अशी तिखट शब्दातली टीका भाजपाचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा पूर्णपणे भिन्न आहे. एका पक्षाला मुख्यमंत्रिपद हवं होतं आणि इतर दोन पक्षांना भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचं होतं, म्हणून या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. जनादेशाच्या विरोधात जाऊन जेव्हा सरकार जन्माला येतं तेव्हा ते दीर्घकाळ टिकत नाही अशीही टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. दरम्यान एकनाथ खडसे यांच्याबाबतही सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं. एकनाथ खडसे हे आमचे नेते आहेत. नाथाभाऊंच्या नेतृत्त्वाखाली मी काम केलं आहे. आपल्या आयुष्यातील परिवाराचा वेळही त्यांनी पक्ष वाढीसाठी दिला. त्यांची काही नाराजी असेल तर ती दूर होईल, काहीतरी नक्की चांगलं घडेल अशीही अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. एवढंच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ खडसेंना त्यांच्या पक्षात घेण्यासाठी आग्रही आहेत पण ते तिथे जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांनी हे भाष्य केलं. भाजपा या पक्षात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे हे बडे नेते नाराज असल्याची चर्चा आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकनाथ खडसे यांनी भेटही घेतली. मात्र त्यावेळी त्यांना जेव्हा तुम्ही नाराज आहात का? हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा माझ्या नाराजीच्या बातम्या खोट्या आहेत असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. तर आता १२ डिसेंबरला म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी गोपीनाथगड या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी एक मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात त्या नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.