‘सातारा जिल्हा शेतकऱ्यांची युद्धभूमी ठरेल’
चालू गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये मिळावी, अशी मागणी करतानाच खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे शुक्रवारी झालेल्या ऊस परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांचा सातारा जिल्हा ही शेतकऱ्यांची युद्धभूमी ठरेल, असे घोषित केले. त्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांना कराड येथे येण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सभेत लक्ष्य करण्यात आले.     
परिषदेला जमलेल्या लाखो शेतकऱ्यांना खासदार शेट्टी पहिली उचल किती जाहीर करणार याची उत्कंठा लागून राहिली होती. या मुद्याचे त्यांनी  विश्लेषणही केले. ते म्हणाले,”या वर्षी उसाला पहिली उचल साखर कारखानदारांनी जाहीर करावी, यासाठी संधी दिली होती. संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करूनही कारखानदार याविषयी बोलण्यास तयार नाहीत.”
गतवर्षी २६०० रुपये पहिली उचल दिली. यंदा कृषिमूल्य आयोगाने ऊस उत्पादन खर्चात केलेली ४०० रुपयांची वाढ गृहीत धरून आगामी गळीत हंगामासाठी प्रतिटन ३ हजार रुपये पहिली उचल द्यावी, अशी आमची मागणी आहे. ही मान्य होत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा देतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चर्चेचे दरवाजे बंद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.     
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा लढय़ाचा कार्यक्रम जाहीर करताना खासदार शेट्टी म्हणाले, “गत हंगामात इंदापूर व वसगडे येथे दोन शेतकऱ्यांना आंदोलनावेळी झालेल्या पोलीस गोळीबारात जीव गमवावा लागला होता. १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या गावी आदरांजली मेळावा घेतला जाणार आहे. तेथे आपण व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत लढय़ाची दिशा स्पष्ट करू. १५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या कराड नगरीमध्ये शेतकऱ्यांना जमण्याचे आवाहन त्यांनी केले.
सहकारी साखर कारखानदारी समृद्ध झाल्याचे स्वप्न यशवंतरावांनी पाहिले होते, पण त्यांच्या वारसदारांनी साखर कारखाने घशात घालून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे.”
 शेतकऱ्यांना वाचवा, त्यांना मुक्ती-न्याय द्या अशी साद या दिवशी चव्हाण साहेबांना घातली जाणार असल्याचे शेट्टी यांनी नमूद केले. ऊस गळीत हंगाम सुरू होण्याच्या पाश्र्वभूमीवर साखरेचे दर राज्यकर्त्यांकडून कृत्रिमरीत्या पाडले जातात असे स्पष्ट करीत शेट्टी यांनी शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य केले. साखर कारखाना विक्रीमध्ये ७०० कोटींचा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी आपल्यापासून करावी. कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास आपली तयारी असल्याचे सांगत त्यांनी तासगावचा साखर कारखाना चालविण्यास देण्याचे आवाहन आर.आर.पाटील यांना केले.