अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या चांगलंच चर्चिलं जात आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलीसदेखील आले आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणाला नवं वळण मिळाल्याचं दिसून येत आहे. या सगळ्या प्रकारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी चक्क खडेबोल सुनावले आहेत.

“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. त्यांचं हे ट्विट पाहून रेणुका शहाणे संतापल्या आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अमृता फडणवीसांवर राग व्यक्त केला आहे.


“सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला राजकीय मुद्दा करु नका. तसंच मुंबई आणि येथील नागरिकांसाठी कोणताही अपशब्द वापरू नका. जर तुमच्याकडे क्षमता आणि ताकद असेल तर त्याचा वापर पोलिसांची मदत करण्यासाठी करा. जर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर असं वक्तव्य केलं असतं का?”, असा सवाल रेणुका शहाणेंनी विचारला आहे.

पुढे त्या म्हणतात, “एक लक्षात असू द्या देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना एल्फिन्स्टन पूलदेखील कोसळला होता. त्यात मुंबईतील अनेक जणांचा मृत्यू झाला होता. परंतु, त्यावेळी मुंबईत राहणं असुरक्षित आहे किंवा मुंबईमध्ये माणुसकी नाहीये वगैरे असं कोणतंच ट्विट केलं नव्हतं?”.

दरम्यान, रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर खरमरती टीका केल्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरु आहे. केवळ रेणुका शहाणेच नव्हे तर अनेकांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.