“मी पुणे शहरात अनेक वेळा आले आहे. या शहराने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले असून या भूमीतून महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान व्यक्तिमत्वांनी देशाच्या एकता अखंडतेची शिकवण दिली. याच आधारे आम्हाला घटनेने आमचे अधिकार दिलेत. पण, एका व्यक्तीला देशाच्या एकता-अखंडतेचं स्वप्न अजिबात आवडत नव्हतं आणि ते व्यक्ती म्हणजे मोहम्मद अली जिना. त्यांनी देशाची खुनी फाळणी केली. आता याच आपल्या देशात नवीन जिना प्रेमी तयार झालेत, त्यांना दुसरी फाळणी हवी आहे”, अशा शब्दात सिने अभिनेत्री स्वरा भास्करने सीएएला विरोध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

एनआरसी, एनपीए आणि सीएए कायद्याविरोधात शनिवारी(दि.18) पुण्यात संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना सिने अभिनेत्री स्वरा भास्करने केंद्र सरकारवर टीका केली. 1947 साली नागरिकांनी संविधान मान्य केले. मात्र आताच्या राज्यकर्त्यांना हेच संविधान मान्य नाही अशी खंत तिने यावेळी व्यक्त केली. तसेच, आपल्या देशाची अर्थव्यवस्था ढासळलीये, बेरोजगारी वाढलीये, शिक्षण महाग झाले आहे. एवढे प्रश्न आपल्यासमोर आहे. यावर सरकार कोणत्याही प्रकारच्या हालचाली करताना दिसत नाही. मात्र घटनेसोबत छेडछाड करत आहेत, ही गंभीर बाब असून याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे ती यावेळी म्हणाली.

“देशातील जनतेचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले असताना. NRC, NPR आणि CAA कायदा आणण्याचे काम सरकारने केले. आहो एवढंच हे सरकार कंटाळलंय, तर पब्जी खेळाळला हवं, टिकटॉक करावं” असा टोलाही स्वराने लगावला. पुढे बोलताना, “तरुणाच्या हाताला रोजगार, पंधरा लाख रुपये, शौचालय असे प्रश्न विचारले तर राम मंदिराचा मुद्दा. काही विचारलं तर हिंदू मुस्लिम आणि पाकिस्तान नावाचा जप. माझी आजी ज्याप्रमाणे हनुमान चालीसा जप करते. त्यानुसार हे पाकिस्तान जप करतात. अशा प्रकारची दिशाभूल करण्याचे काम हे सरकार करीत आहे, अशा शब्दात स्वरा भास्करने केंद्र सरकारवर निशाणा साधला.