ताडदेवमधील एम पी मिल कंपाऊंड येथील घोटाळ्यावरुन लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर ताशेरे ओढले असून प्रकाश महेतांवरील आरोपांवर लोकयुक्तांनी शिक्कामोर्तब केले आहे. आता किमान जनाची नाही तर मनाची लाज ठेऊन महेता यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी तो घ्यावा. अन्यथा, राजीनामा घेतल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

गुरुवारी टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाश महेता यांच्यासंदर्भात एक वृत्त दिले होते. या वृत्तानुसार लोकायुक्तांनी ताडदेवमधील एम पी मिल कम्पाऊंड येथील घोटाळ्यावरुन प्रकाश महेता यांच्यावर ताशेरे ओढले होते. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी प्रकाश महेतांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.  सतत क्लीन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पितळ देखील उघडे पडले असून आता किमान जनाची नाही तर मनाची लाज ठेऊन महेता यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी तो घ्यावा. अन्यथा, राजीनामा घेतल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे, भ्रष्टचाराचे थैमान घालणाऱ्या १६ मंत्र्यांच्या गैरकारभरातील सत्य हळूहळू बाहेर येणार, असेही त्यांनी म्हटले आहे.

लोकायुक्तांनी काय म्हटले आहे?

लोकायुक्त एम एल तहलियानी यांनी एम पी मिल कम्पाऊंड येथील पुनर्विकास प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी केली. चौकशीनंतरच्या अहवालात लोकायुक्तांनी प्रकाश महेता यांच्यावर ताशेरे ओढले आहे. प्रकाश महेता यांच्या भूमिकेवर लोकायुक्तांनी प्रश्न उपस्थित केले असून प्रकाश महेता निष्पक्षपणे काम करण्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकायुक्तांचा अहवाल पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात सादर करण्यात करण्यात येणार आहे.