गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणाला दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करुन मदत जाहीर केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी २१ मे रोजी दिलं होतं. “करोना संकट असताना त्यात तौते चक्रीवादळाने भर टाकली आहे. शेवटी वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर यावर नुकसान अवलंबून असतं. दुर्दैवाने काही मृत्यू झाले आहेत. कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल,” असं सांगितलं होतं.

“मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. “पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार,” असंही ते म्हणाले होते. मदतीचे निकष बदलण्यासाठी आपण मोदींसोबत झालेल्या बैठकीत सांगितलं होतं, त्यासंबंधी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार असल्याची माहिती तेव्हा त्यांच्याकडून देण्यात आली होती.