शिक्षकांच्या वेतनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर या प्रकरणी विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेतला गेला. त्यानंतर अनेक शिक्षकांच्या खाते बदलाची प्रक्रियाही सुरु करण्यात आली. या प्रक्रियेला स्वाभाविकपणे काही कालावधी घेण्यात आला. त्यामुळे गुढी पाडव्याच्या दिवशी शिक्षकांचे पगार होऊ शकले नाहीत. याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि येत्या तीन दिवसांत शिक्षकांचे पगार होतील हे आश्वासन देतो असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

विधानभवनात प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्व प्रक्रियापूर्ण व्हायला २०-२५ दिवस लागतात, त्यामुळे जुन्याच मुंबई बँकमधून वेतन या महिन्यापुरता काढावा असे विभागाचे म्हणणे होते. परंतु शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हट्टापायी शिक्षकांचे वेतन होऊ शकले नाही, काही जणांचा हट्ट युनियन बँकेचा होता, त्यामुळे हा उशिर झाला ही वस्तूस्थिती आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांच्या वेतनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे, त्यामुळे उरलेली कार्यवाही पूर्ण करुन शिक्षकांचे वेतन तीन दिवसांत मिळेल, असे तावडे यांनी सांगितले.