अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर; विदर्भामध्ये पावसाची शक्यता कायम

राज्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसानंतर उकाडय़ात वाढ झाली असून, पुढील चार ते पाच दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होऊन उन्हाचा चटका वाढणार आहे. त्याचप्रमाणे पुढील तीन दिवस विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये ४ आणि ५ एप्रिलला उष्णतेची लाट होती. काही ठिकाणी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास किंवा त्यापुढेही नोंदविला जात आहे. कमाल तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंशांनी वाढ नोंदविली जात आहे. कोकण विभागातही तापमानात काहीशी वाढ नोंदविण्यात येत आहे.

कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीचा उकाडा वाढत आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. शनिवारी विदर्भातील वर्धा येथे ४३.४ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुण्यात तापमान ४० अंशांच्या आसपास आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे ३३ अंश तापमान होते. मराठवाडय़ातील बीडमध्ये ४१ अंशांपुढे तापमान आहे. विदर्भात अमरावती, चंद्रपूर, नागपूर आदी ठिकाणी ४३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद होत असून, या भागात सर्वाधिक उकाडा आहे.

तापभान..

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कर्नाटकच्या परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र सध्या विरून गेले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. मराठवाडा आणि विदर्भात सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांवर आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.