येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर शहराजवळ तुरोरी गावाजवळ टँकरने सहा आसनी रिक्षाला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षातील दहा जण ठार तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.                                                                        याबाबत माहिती अशी, की शनिवार तुरोरी गावाचा आठवडी बाजार होता, हा बाजार करून गावाकडे काही लोक सहा आसनी रिक्षामधून जात होते. या वेळी हैदराबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या एका टँकरने अन्य एका रिक्षाला चुकवण्याच्या प्रयत्नात या प्रवाशांनी भरलेल्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात दहा जण ठार तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. खाजा रहिमान मासुलदार (वय ५०, रा. तलमोड ता उमरगा), सोनुबाई नरसाप्पा सास्तुरे (वय ५५, रा. धाकटीवाडी, ता. उमरगा), प्रकाश पांडुरंग मंडले (वय २१, रा. तुरोरी, ता. उमरगा), विष्णू नंदकुमार भोसले (वय २०, रा. तुरोरी, ता उमरगा), सुकुमारबाई पांडुरग बंडगर (वय ५०, रा. बंडगरवाडी), राहयाबाई आगजी हाके (वय ६०, रा. बंडगरवाडी), व नंदनी निवृत्ती बोधे (वय पाच महिने, रा. बंडगरवाडी) हे सात जण जागीच ठार झाले. तर सात जखमींपैकी तीन जणांचे रुग्णालयात नेत असताना निधन झाले. उर्वरित चार जणांची स्थिती गंभीर आहे.