तासगाव साखर कारखाना एक वर्षांच्या भाडे कराराने चालविण्यासाठी राज्य सहकारी बँकेने निविदा जारी केली असून किमान अडीच कोटी व प्रतिटन १०० रुपये असे भाडे राज्य बँकेला अपेक्षित आहे. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा सोनहिरा व अरुण लाड यांचा क्रांती सहकारी साखर कारखाना तासगाव कारखाना चालविण्यास घेण्यासाठी इच्छुक आहेत. आजारी साखर कारखाने चालविण्यास देत असताना दीर्घ मुदतीच्या कराराने देण्यात यावेत अशी भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यानी मांडली असताना राज्य बँक पुन्हा एक वर्षांच्या करारावर आली आहे. गतवर्षी कारखाना चालविण्यास घेण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांचा गणपती जिल्हा संघ आणि सोनहिरा साखर कारखाना यांच्यात स्पर्धा होती. तासगाव साखर कारखाना खासदार पाटील यांच्या ताब्यात असताना राजकीय संघर्ष टोकाला पोहचला होता. राज्य बँकेने यावेळी निविदेत किमान भाडय़ात कपात केली आहे. अडीच हजार क्षमतेच्या कारखान्यासाठी किमान सात कोटी रुपये आणि प्रतिटन १०० रुपये असा भाडेपट्टा असताना यावेळी मात्र बँकेने अडीच कोटी रुपये किमान देकार रक्कम निश्चित केली आहे. कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी सुमारे तीन कोटींची भांडवली गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळेच बँकेने किमान देकार रक्कम कमी केल्याचे मानले जात आहे.