हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यू झाल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. नागरिक संतप्त असून रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त करत आहेत. सोमवारी सकाळी पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी यावेळी मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडवली होती. तसंच काहीजणांनी दगडफेकही केली. नागरिकांकडून पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात कऱण्यात आला आहे.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचं विशेष पथक तरुणीवर उपचार करत होतं. मात्र, सोमवारी अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्यानं तिचा मृत्यू झाला.

हिंगणघाटमधील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय नेत्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सगळेच संताप व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पीडितेच्या मृत्यूनंतर संताप व्यक्त करत आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच खरी पीडितेला श्रद्धांजली असल्याचं म्हटलं आहे. “हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही, ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा – आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली – अजित पवार

अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल. पण आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल”. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे. या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाट वसियांच्या दुःखात सहभागी आहे”.

आणखी वाचा – हैदराबाद पोलिसांचं समर्थन करण्याची वेळ येऊ नये हीच न्यायव्यवस्थेला हात जोडून विनंती – मकरंद अनासपुरे

हैदराबाद पोलिसांचं समर्थन करण्याची वेळ येऊ नये – मकरंद अनासपुरे
मकरंद अनासपुरे म्हणाले की, “हिंगणघाट जळीतकांडातील भगिणीच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी ऐकून खूप हळहळ वाटत आहे. एक सात्विक संताप देखील होत आहे की, कुठलंही कारण नसताना अशा पद्धतीने एखाद्याला जीव द्यावा लागतोय. ही समाजासाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे”.

“केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की अशा प्रकरणांचा लवकरात लवकर छडा लावून आरोपींना कडक शासन होणे गरजेचे आहे. निर्भयाचे बलात्कारी अजूनही फासावर चढलेले नाहीत. तारखांवर तारखा पडत चाललेल्या आहेत. एकंदरीतच अशा पद्धतीच्या घटनांमध्ये वाढ होणे हे समाजाला चिंतीत करणारे आहे. या आरोपींना तात्काळ शासन व्हावं असं नागरिक म्हणून फार मनापासून वाटतं. हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये हीच न्यायव्यवस्थेला आणि केंद्र शासनाला हात जोडून विनंती,” असल्याचंही ते म्हणाले आहेत.