जळगावमध्ये एसटी कंडक्टरने आत्महत्या केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाकरे सरकारने लगेचच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि एक महिन्यांचा पगार देण्याची घोषणा केली आहे. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकला आहे. त्यात या महिन्याचा पगार तासाभरात केला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी आणखी एका महिन्याचा पगार देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचा पगार देण्यासाठी पत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पत्रक जारी केले आहे.

आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याने पत्रात काय म्हटले होते?
‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा’ असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.