“आमच्या जातीला आरक्षण नाही तेच बरं आहे अन्यथा मी कुठेतरी बाबू झालो असतो. मी घरच्यांना आधीच सांगितलं होतं, मला नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा व्हायचं आहे.” केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य नागपूर या ठिकाणी केलं आहे. नागपुरात अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनाला नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.

“मी सगळ्याच समाजांच्या कार्यक्रमात जातो, प्रत्येक समाजा मागणी केली जाते की आम्हाला राजकारणात जागा मिळाली पाहिजे, मंत्रीपद आमच्या समाजाला मिळालं पाहिजे. मात्र विशिष्ट समाजातला माणूस मंत्री झाला की त्याच्या हातून विकास होईलच असं नाही, त्याला सगळ्यांचाच विचार करावा लागतो ” असंही गडकरींनी म्हटलं आहे.

आम्ही असे नेते तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे जे देशाला विकासाचं लक्ष्य गाठून देतील. राज्याच्या विकासासाठी काम करतील. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न जाहीर करावं अशी मागणी माळी समाजाने केली आहे. तो त्यांना मिळावा यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

“जे लोक कर्तृत्त्वाने हरतात ते तिकिट मागण्यासाठी जातीचा आधार घेतात” असाही टोला नितीन गडकरी यांनी लगावला. आरक्षण मिळाल्याने सगळा विकास होतो हा समज चुकीचा आहे. कर्तृत्त्वही विकास घडवतं त्यामुळे आपण जे काम करतो त्या कामालाही महत्त्व दिलं पाहिजे असंही गडकरींनी सांगितलं.