मराठा मोर्चाच्यावतीने पुणे-औरंगाबाद महामार्गावरील कायगाव टोका येथे कालपासून सुरु असलेले चक्का जाम आंदोलन मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मागे घेण्यात आले. मोर्चाच्या समन्वय समितीचे सदस्य संतोष जाधव यांनी ही माहिती दिली आहे. पंढरपूरहून घरी परतणाऱ्या वारकऱ्यांची वाहने याच मार्गावरून जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पुलावर सोमवारी दुपारी ३ वाजल्यापासून मराठा क्रांती मोर्चाकडून सुरु असलेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान सोमवारी काकासाहेब शिंदे (वय २८) या तरुणाने नदीच्या पात्रात उडी घेतली होती, यात त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर आक्रमक झालेल्या मराठा समाजाने आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन पुढे चालूच ठेवण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे गेल्या २८ तासांपासून पुणे-औरंगाबाद महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. दरम्यान, काल आषाढी एकादशीनिमित्त राज्यातून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर आज ते परतीच्या मार्गावर असल्याने औरंगाबादेत परतणाऱ्या वारकऱ्यांना आंदोलनामुळे त्रास नको म्हणून कायगाव टोका येथील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर आंदोलनादरम्यान एसटी बसेस तसेच सार्वजनिक संपत्तीची तोडफोड करू नये असे आवाहन मोर्चाच्या समन्वयकांनी आंदोलकांना केले आहे.