लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असे आश्वाासन देत ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ओबीसी समाजाच्या वतीने भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह प्रभारी मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मराठा समाजाच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती आहे. आता त्याच धर्तीवर ओबीसी समाजासाठीही मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचे आश्वाासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी या शिष्टमंडळाला दिले.

ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची आपल्याला जाणीव असून त्यांची पूर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल. या समितीने ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तत्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने निधीसाठीही मागणी करतांना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चिात करावीत. टप्प्याटप्प्याने ओबीसी समाजाचे प्रश्न आपण नक्की मार्गी लावू. करोनामुळे टाळेबंदी लागली आणि त्यामुळे कामांची गती मंदावून आरोग्य या विषयाची प्राथमिकता वाढली, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.