राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(मंगळवार) फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना राज्यात १५ दिवसांसाठी संचारबंदीची मोठी घोषणा केली.याचबरोबर राज्यात सध्या बेड्स, व्हेंटिलेटर्ससह ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे. हवाई मार्गाने ऑक्सिजन अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात दररोज साधरणपणे १२०० मेट्रीक टन ऑक्सिजनचं उत्पादन होतं. आजच्या घडीला आपण १०० टक्के ऑक्सिजनचा वापर हा पूर्णपणे आरोग्य सुविधांसाठी म्हणजे ज्या करोनाबाधितांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हा प्राणवायू वापरतो. साधरणपणे आज आपण दररोज ९५० ते १००० टन एवढा ऑक्सिजन वापरतो आहोत. बेड्स मिळत नाहीत, ऑक्सिजन अपुरा पडत आहे. रेमडेसिवीरची प्रचंड मागणी वाढलेली आहे. आपण औषध पुरवठा कमी पडू देणार नाही, जिथून मिळतील तिथून औषध घेत आहोत.”

CM Addressing Maharashtra Live : राज्यातील लॉकडाउनसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद!

तसेच, “ऑक्सिजनबाबत केंद्र सरकारकडे आपण विनंती केलेली आहे. काही दिवसांअगोदर पंतप्रधानांबरोबर जी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, तेव्हा त्यांना मी ही परिस्थिती सांगितली. साहाजिकज आहे पंतप्रधानांकडे दररोज अहवाल जातो आहे. मी पंतप्रधान मोदींना विनंती केली की, आम्हाला येत्या काही काळात ऑक्सिजनची आवश्यकता भासणार आहे. राज्यातील कारखाने, उद्योगांना देखील ऑक्सिजनबात विनंती करण्यात आली असून, त्यांनी देखील क्षमेतप्रमाणे ऑक्सिजन द्यायला त्यांनी सुरूवातही केली आहे. मात्र तरी देखील अधिकचा जो ऑक्सिजन लागणार आहे, तो आम्हाला अन्य राज्यांमधून आणण्यासाठी परवानगी द्या आणि ती वाहतूक सोयीस्कर होईल याच्यासाठी देखील मदत करा. इतर राज्यांमध्ये देखील जे ऑक्सिजन उत्पादक आहे, त्यांच्याकडून आपल्याकडे रस्ते मार्गाने ऑक्सिजन यायला किती वेळ लागणार? आणि किती येणार? आपल्याला सुरळीत पुरवठा हवा आहे. यासाठी मी पंतप्रधानांना विनंती करतो आहे, त्यातील एक म्हणजे रस्ते मार्गाने ऑक्सिजन आणे पर्यंत आमच्याकडे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला कल्पना नाही असं करता येणं शक्य आहे का? असेल तर आपल्याला लष्करी तज्ज्ञांची मदत घेऊन, जर हवाई वाहतूकीने आपण ऑक्सिजन आणू शकलो आणि आणू शकत असू तर कृपा करून आम्हाला केवळ परवानगी नाही तर हवाई दलाला सांगून आम्हाला मदत करायचे तसे आदेश द्या. आता एवढी निकड आपल्याला ऑक्सिजनची आहे. या मागणीसाठी मी पंतप्रधानांना फोन देखील करणार आहे व पत्र देखील लिहणार आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.