“वीज बिलात सवलत मिळाली पाहिजे ही काँग्रेसचीही भावना आहे. परंतु केंद्र सरकार जनतेची दररोज लूट करत आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव कमी असताना देशात इंधनाचे दर वाढवून केंद्र सरकार जनतेची लूट करत आहे. वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी या लुटमारी विरोधातही आंदोलन करावे.” असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे होते –
याशिवाय थोरात यांनी “राज्यात अतिवृष्टी, पुरामुळे मोठे नुकसान झाले असताना केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे होते. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून महाविकास आघाडी सरकारने तातडीने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. परंतु केंद्राने मदत देणे दूरच नुकसानीची पाहणी करायला पथकही अद्याप पाठवले नाही. केंद्राची ही भूमिका राज्याला सापत्नभावाची वागणूक देणारी आहे, ” असे म्हणत केंद्र सरकारवर टीका देखील केली आहे.

“ये तो बस झांकी है, आगे और लढाई बाकी है!..”; चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा

करोना संकटामुळे महसुल घटला आहे तर दुसरीकडे संकटांची मालिकाच सुरु आहे अशा परिस्थीतीत केंद्र सरकारने राज्याला मदतीचा हात दिला पाहिजे, पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. उलट जीएसटी परतावा व राज्याच्या हक्काचे पैसेही दिले जात नाहीत. विरोधी पक्षांच्या सरकारांची कोंडी करण्याचा केंद्रातील भाजपा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणाचा राजकीय कारणांसाठी वापर करुन विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न –
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेली कारवाई दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असून भाजपाविरोधात  बोलणाऱ्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडी, सीबीआय, सारख्या केंद्राच्या तपास यंत्रणाचा राजकीय कारणांसाठी वापर करुन विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी कारवाई भाजपाशासित राज्यात झाल्याचे दिसत नाही. असं थोरात म्हणाले आहेत.

शिवसेना नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे दिवास्वप्न भाजपाचे नेते पाहत आहेत. त्यांनी ही स्वप्ने पहात रहावीत, असा टोला थोरात यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. तसेच मी पुन्हा येणार असे म्हणणाऱ्यांचे काय झाले, हे आपण पहातच आहोत. महाराष्ट्रात भाजपाचे कोणतेही ऑपरेशन यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला असून पुढील चार वर्षाचा कार्यकाळ ही पूर्ण करू, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.