नितीन पखाले

करोनाचा संसर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फोफावत असताना यवतमाळ शहरवासीयांना करोनाने एक महिन्यानंतर दिलासा दिल्याचे चित्र आहे. गेल्या २९ दिवसांपासून यवतमाळ शहरात एकाही करोनाग्रस्ताची नोंद वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे झालेली नाही. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत शहरातील प्रतिबंधित भागातील निर्बंध पूर्णपणे उठण्याची शक्यता आहे.

यवतमाळ शहरातील राधानगरी भागातून सुरू झालेला करोना संसर्गाचा प्रवास इंदिरा नगर, पवारपुरा, स्टेट बँक चौक, मेमन कॉलनी, डोर्लीपुरा, शारदा चौक असा राहिला. यवतमाळ शहरातील ९८ व्यक्तींना करोनाने आपल्या विळख्यात घेतले. सुदैवाने या सर्वांनी करोनाशी दोन हात करून ही लढाई जिंकली. या काळात इंदिरा नगर आणि पवारपुरा या परिसराची केंद्र सरकारकडे करोना हॉटस्पॉट म्हणून नोंद झाली. इंदिरा नगरमध्ये तब्बल ६१ आणि पवारपुरा परिसरात करोनाचे २० रूग्ण आढळले. यातील बहुतांश रूग्ण हे ‘मरकज’हून यवतमाळात परतल्यानंतर करोनाबाधित आढळलेल्या रूग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेले होते. अगदी दीड वर्षांच्या बालकापासून ६५ वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेक महिला, पुरूषांना करोना संसर्ग झाला होता. त्यामुळे इंदिरा नगर, पवारपुरा, मेमनकॉलनी, डोर्लीपुरा, पाटीपुरा आदी भाग प्रतिबंधित करण्यात आला होता.

आणखी वाचा- GOOD NEWS : राज्यातील ‘हा’ जिल्हा झाला करोनामुक्त

रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर बहुतांश भागातील प्रतिबंध प्रशासनाने टप्याटप्याने हटवले. सध्या केवळ इंदिरानगरातील काही भागात हे प्रतिबंध कायम आहेत. गेल्या १५ मे रोजी शहरातील इंदिरा नगर भागातून अखेरचा रूग्ण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला होता. उद्या १३ जून रोजी यवतमाळ शहरात एकाही करोनाबाधिताची नोंद न होण्यास २९ दिवस पूर्ण होतील. या रूग्णासही उपचारानंतर सुट्टी होऊन १४ दिवस झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला यवतमाळ शहरातील केवळ एक परिचारिका वगळता एकही करोनाबाधित रूग्ण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल नाही. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत यवतमाळ शहर पूर्णपणे करोनामुक्त होईल.

पुढील दोन दिवसात प्रतिबंधित भागातील सर्व निर्बंध हटवणार – जिल्हाधिकारी

यवतमाळ जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६० वर गेली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. यवतमाळ शहरात १५ मे नंतर गेल्या २८ दिवसांपासून एकही करोनाचा रूग्ण आढळला नाही. त्यामुळे पुढील दोन दिवसात शहरातील प्रतिबंधित भागातील सर्व निर्बंध हटविण्यात येतील, असे सिंह यांनी सांगितले. मात्र, यवतमाळकरांनी नियमांचे उल्लंघन करू नये. शहर करोनामुक्त झाले तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे अनावश्यक गर्दी, आनंदोत्सव टाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले.